केंद्र सरकारचा निर्णय – विमा भरपाईही मिळणार – वेतनाच्या 90 टक्केपर्यंत आर्थिक मदत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना साथीच्या आजारामुळे कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास केंद्र सरकारतर्फे वारसांना पेन्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही पेन्शन सरासरी दैनंदिन पगाराच्या 90 टक्के इतकी असणार असल्याचेही पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कुटुंबातील उत्पन्न मिळविणाऱया म्हणजे कर्त्या सदस्याचा कोविड-19 मुळे बळी गेल्यास अवलंबितांना पेन्शन देण्यात येईल, असे सरकारने शनिवारी जाहीर केले. कुटुंबातील अवलंबितांना निवृत्तीवेतनाशिवाय वाढीव विमा भरपाईही देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विमा लाभाची रक्कम 6 लाख रुपयांवरून 7 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे आणि किमान विमा लाभांची 2.5 लाख रुपयांची तरतूद पुनर्संचयित केली गेली आहे. या मदतीच्या माध्यमातून बाधित कुटुंबांच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची स्पष्टोक्ती सरकारने दिली आहे.
कोरोना पीडितांच्या वारसांना पेन्शन देण्याची योजना सरकारने जाहीर केली. त्यानुसार कुटुंबांना सन्मानाचे जीवन जगण्यासाठी आणि उत्तम जीवन जगण्यासाठी मदत करण्यासाठी, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) पेन्शन योजनेचा लाभ देखील वाढविला जाणार आहे. हा लाभ मागील वर्षाच्या मार्च 24 पासून आणि 24 मार्च 2022 पर्यंत अशा सर्व प्रकरणांसाठी पूर्वलक्षीरित्या उपलब्ध असेल. ‘ईडीएलआय’ योजनेतील विमा लाभात वाढ केल्याने विशेषतः साथीच्या आजारामुळे आपला जीव गमावलेल्या कर्मचाऱयांच्या कुटुंबांना मदत होईल, असे पीएमओने स्पष्ट केले आहे.