विजापूरजवळ भीषण अपघात : मृतांमध्ये ट्रकचालक, आई-वडिलांसह दोन मुलींचा समावेश
वार्ताहर /विजापूर
दुरुस्तीसाठी थांबलेल्या ट्रकला भरधाव कारने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात 5 जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चार जण असून यामध्ये आई-वडील व दोन मुलींचा समावेश आहे. ही घटना बुधवार दि. 20 रोजी सकाळी 9.20 वाजण्याच्या सुमारास बबलेश्वर तालुक्यातील होनगनहळ्ळीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 50 वर घडली.
मंजुनाथ मुंडेवाडी (वय 34), काव्या मुंडेवाडी (वय 32), आराध्या मुंडेवाडी (वय 8), आयुक्ता मुंडेवाडी (वय 3), ट्रकचालक आयुब पठाण (वय 42) अशी मृतांची तर अप्पू मुंडेवाडी (वय 11) असे जखमीचे नाव आहे. सदर मुंडेवाडी कुटुंबीय सुटी असल्याने गोव्याला पर्यटनासाठी गेले होते. तेथून परतताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
मंजुनाथ मुंडेवाडी हे शिक्षक असून विजापूर शहरातील पीडीजे हायस्कूलमध्ये कार्यरत होते. दरम्यान, मंगळवार व बुधवार सलग दोन दिवस सुटी असल्याने ते कुटुंबीयांसमवेत कारने (केए 28, एन 9513) गोव्याला गेले होते. ते गोव्याहून हुबळीमार्गे विजापूरला परतत होते. तर विजापूरहून हुबळीला जाणाऱया ट्रक (एमएच 12, सीएच 3166) मध्ये बिघाड झाल्याने ट्रकचालक आयुब पठाण याने होनगनहळ्ळीजवळील गॅरेजवर ट्रक दुरुस्तीसाठी थांबविला होता.
त्यावेळी मंजुनाथ यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची ट्रकला जोराची धडक बसली. यात मंजुनाथ, काव्या, आराध्या व ट्रकचालक आयुबचा जागीच मृत्यू झाला. तर आयुक्ता व अप्पू हे गंभीर जखमी झाले. तीन वर्षीय आयुक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच सध्या अप्पूवर उपचार सुरू आहेत.
दोन्ही वाहनांचा चक्काचूर
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीसप्रमुख एच. डी. अनंतकुमार, डीवायएसपी राम अरसिद्धी, डीएसपी लक्ष्मीनारायण, सीपीआय मदभावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला. या घटनेची नोंद विजापूर ग्रामीण पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.