सहा जणांना वाचवले – सहा मृतदेह हाती – तिघे बेपत्ता
अयोध्या / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील अयोध्येत एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील प्रसिद्ध गुप्तार घाटाजवळ असलेल्या सरयू नदीत स्नान करण्यासाठी उतरलेले एकाच कुटुंबातील 15 जण बुडाले. या घटनेदरम्यान स्थानिकांनी सहा जणांना वाचवले असून सहा मृतदेह हाती लागले. तसेच तिघेजण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
शुक्रवारी सकाळच्या सुमारास येथे पर्यटनासाठी आलेले एक कुटुंब स्नानासाठी शरयू नदीपात्रात उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वजण पाण्याच्या विळख्यात अडकले. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत काहींना वाचवले. हे कुटुंब सिकंदराबादहून अयोध्येत पर्यटनासाठी आले होते. शुक्रवारी शरयू नदीवरील गुप्तार घाटावर अंघोळ करताना कुटुंबातील दोन सदस्य पाय घसरून पाण्यात पडले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून जाऊ लागल्याने कुटुंबातील अन्य सदस्यांनी एक-एक करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात 15 जण नदीत बुडाले. गुप्तार घाटावरील आरडाओरडा ऐकून स्थानिक लोक आणि नावाडय़ांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच पोलिसांनाही याची माहिती दिली. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने 6 जणांना सुखरुप बाहेर काढले आहे
मृत लोक हे एकाच परिवारातील असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आगरा येथून चार परिवारातील 15 लोक अयोध्येत फिरण्यासाठी आले होते. गुप्तार घाटात सर्वजण आले असता तेथील नदीत अंघोळ करण्यासाठी उतरल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. रेस्कू ऑपरेशनचे नेतृत्व एसएसपी शैलेश पांडे यांच्याकडून केले जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त करत जिल्हा प्रशासनाला मदत व बचावासाठी पावले उचलण्याची सूचना केली आहे.