गाडी आहे तर डिझेल अनुदान नाही, दोन्ही आहेत तर चालक रजेवर, चालक आहे, इंधन आहे तर गाडी गॅरेजमध्ये ही अवस्था आपल्याकडील शासकीय किंवा निमशासकीय आस्थापनांमध्ये बऱयाचदा दिसते. परंतु आफ्रिकेतील इथिओपिया या देशात त्यापेक्षाही अवघड आणि कित्येक पट गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथील दुष्काळग्रस्त भागात मदत घेऊन गेलेले शेकडो ट्रक इंधन उपलब्ध नाही म्हणून तीन साडेतीन महिन्यांनंतरही परत आले नाहीत, आणि ‘युनो’सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून केल्या जाणाऱया मदतकार्यावरही या परिस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे.
कल्पना करणे कठीण अशी स्थिती जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये आहे. आफ्रिकेतील बरेच देश दुष्काळ, कुपोषण, अन्नटंचाई यांनी ग्रासलेले आणि अस्थिर सरकारे, वर्षानुवर्षे खुर्च्यांना चिकटून बसलेले हुकूमशहा, अंतर्गत बंडाळी नि दहशतवाद यांनी घेरलेले आहेत. इथिओपिया या देशाच्या राजधानीत आफ्रिकन राष्ट्रांच्या संघटनेचे मुख्यालय आहे, पण त्याच देशात फुटीरतावादी शक्ती शिरजोर झाल्या आहेत. या देशातील टिग्रे नांवाचा उत्तरेकडील प्रांत बंडखोरीने अशांत आहे. इटालियन वसाहतवाद्यांकडून स्वातंत्र्य मिळाले तेव्हा तो तांबडय़ा समुद्राच्या नैऋत्येला पसरलेला देश होता, परंतु 1993 मध्ये इरिट्रिया हा ईशान्येकडील प्रांत फुटून स्वतंत्र झाल्यावर इथिओपियाचा जलमार्गाशी संपर्क तुटला आणि तो एक भूवेष्टित देश बनला. आता इरिट्रियाच्या सरहद्दीलगत असलेल्या टिग्रे या इथिओपियामधील प्रांतातही बंडखोरी चालू आहे. ‘टिग्रे पीपल्स लिबरेशन प्रंट (टीपीएलएफ)’ या संघटनेचा मोठा प्रभाव आहे.
या टिग्रे प्रांतात दुष्काळ आणि शेतीचे घटलेले उत्पादन या दोन प्रमुख कारणांनी अन्नटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच अशांतता भर घालत आहे. संपूर्ण इथिओपिया देशात 1 कोटी 32 लाख लोक उपासमारीने बेजार झालेत. त्यांपैकी जवळजवळ चाळीस टक्के म्हणजे 52 लाख लोक एकटय़ा टिग्रे प्रांतात आहेत. त्यांना अन्नपुरवठा करण्यासाठी सहा आठवडय़ांची मोहीम आखली आहे, दररोज 8 लाख 70 हजार माणसांना याप्रमाणे अन्न पुरवठा होणे अपेक्षित आहे. दररोज साधारणपणे शंभर ट्रक माल जायला हवा. परंतु सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे अन्न धान्य वगैरे वस्तूंची मदत घेऊन गेलेले शेकडो ट्रक परतच आले नाहीत. याचे कारण त्यांना परतीच्या प्रवासाकरिता इंधन मिळाले नाही. गेल्या वषीच्या जुलैपासून परिस्थिती वेगाने बिघडत गेली. जुलै आणि सप्टेंबर महिन्यांच्या मध्यावर गेलेले ट्रक परतले नाहीत. 16 सप्टेंबर रोजी 466 ट्रक टिग्रे प्रांतात गेले त्यातले फक्त 38 परतले. बाकीचे ट्रक कुठे गेले?
परत येण्यासाठी इंधन नसल्याने ते टिग्रेतच राहिले. इंधन का मिळाले नाही आणि इतक्मया मोठय़ा संख्येने मालट्रक अडकून राहिले तरी इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणी काही प्रयत्न करत नाही ? असे प्रश्न कोणाच्याही मनात येणे स्वाभाविक आहे. टिग्रे प्रांताला दर आठवडय़ाला दोन लाख लीटर इंधनाची गरज आहे, मात्र जुलैच्या मध्यापासून सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत सगळे मिळून तीन लाख लीटर एवढेच इंधन पुरविण्यात आले. 29 जुलै रोजी शेवटचा टँकर इंधन घेऊन गेला आणि 17 सप्टेंबरपासून पेट्रोल पंपांवर खडखडाट झाला! यानंतर चारच दिवसांनी टिग्रेकडे जाणारे नऊ टँकर टिग्रेशेजारील अफार प्रांताची राजधानी सेमेरा या शहरी पुढच्या प्रवासाची परवानगी मिळण्याची वाट पहात उभे होते. गेल्या आठवडय़ाअखेर ‘युनो’च्या माहितीनुसार 14 भरलेले इंधनवाहू टँकर अफारमध्ये उभे होते.
या साऱयाच्या मुळाशी इथिओपियामधील अशांतता आहे. ‘टीपीएलएफ’ बंडखोरांनी राजधानी आदिस अबाबावर चाल करून जाण्याची धमकी दिल्यामुळे नोव्हेंबर 2020 पासून देशात आणीबाणी घोषित करण्यात आली. यापूर्वी प्रांतीय सत्तेत असणाऱया ‘टीपीएलएफ’ विरोधात सशस्त्र दले पाठवल्याने राजधानीवर चालून जाण्याची घोषणा करावी लागली असे या बंडखोरांचे म्हणणे तर त्यांच्या दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलावे लागले असे सरकारचे म्हणणे. मदतसाहित्य घेऊन जाणारे ट्रक इंधनाच्या कमतरतेमुळे थांबतात हे सरकारला मान्य नाही, ‘टीपीएलएफ’ त्यांना रोखते असे सरकारचे म्हणणे.
याउलट, ‘टीपीएलएफ’ म्हणते की याला सरकार जबाबदार आहे. वास्तविक मदतसाहित्य घेऊन जाणाऱया वाहनांना जाण्यायेण्याचे इंधन देण्याची पद्धत आहे, पण परतीसाठी दिले जात नाही असा या संघटनेचा आरोप. ट्रकचालकांपैकी अनेकजण टिग्रेप्रांतीय (टिग्रे एथनिक) आहेत. तपासणी नाक्मयांवर इथिओपियन लष्कर आणि स्थानिक सुरक्षा अधिकारी या चालकांना दमबाजी आणि मारहाण करतात असा या संघटनेचा आरोप आहे, तर मदतवस्तूंची वाहतूक गतिमान व्हावी म्हणून आपण तपासणी नाक्मयांची संख्या सातवरून दोनपर्यंत खाली आणली असा सरकारचा दावा! अफार प्रांताची राजधानी सेमेरे आणि टिग्रेची राजधानी मेकेल्ले यांना जोडणाऱया रस्त्यावर चालकांना सतावणूक, मारहाण, धमक्मया आणि चोऱया यांना तोंड द्यावे लागते. टिग्रेमधल्या बँका बंद आहेत. आणि अफार प्रांतातून टिग्रेला जाण्यास हा एकच रस्ता आहे. अफारमधल्या सशस्त्र इथिओपियन पोलिसांकडून खुद्द ‘युनो’च्या एका पथकाला असाच अनुभव आला. त्यामुळे ‘टीपीईफ’च्या म्हणण्यात काही तथ्य नाही असे म्हणता येत नाही.
एकीकडे अन्नधान्य घेऊन जाणाऱयांना इंधन पुरवठय़ात अडचणी येत असल्या तरी आरोग्य कर्मचारी त्यातही चांगली सेवा देण्याच्या प्रयत्नात आहेत. रोगराई आणि कुपोषणामुळे होणाऱया आजारांना काबूत आणण्यासाठी औषधे घेऊन जाणारे ट्रकदेखील रखडले. ते प्रतिजैविके (अँटिबायोटिक), हिवताप (मलेरिया) वरील औषधे वाहून नेतात. वैद्यकीय कर्मचारी वापरतात तसले संरक्षक पोशाख ( पीपीई) ते वाहून नेतात. ते रखडल्यामुळे शेवटी हेलिकॉप्टरमधून मदत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी आहे अन्नपुरवठा मोहिमेची शोकांतिका !
-राजेंद्रप्रसाद स. मसुरकर