प्रतिनिधी/ वास्को
कुठ्ठाळीत उमेदवारांच्या भाऊ गर्दीत उत्स्फुर्त मतदान पार पडल्यानंतर अपक्ष उमेदवार अँथनी वास यांच्या नावाची चर्चा वाढू लागली आहे. त्यांच्याशी काही राजकीय पक्षानी सत्तेसाठी खलबते सुरू केल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. खरेच कुठ्ठाळीत अँन्थनी वास बाजी मारतात की अन्य कुणाची सरशी होते हे पाहणे रंजक ठरणार आहे. मागच्या निवडणुकीत अँन्थनी वास भाजपाच्या तत्कालीन उमेदवार एलिना साल्ढाना यांच्याकडून 500 मतांच्या फरकाने हरले होते. त्यामुळेच मतदानाचा ओघ त्यांच्याकडे गेल्याचे लोकांमध्ये बोलले जात आहे.
कुठ्ठाळी मतदारसंघ यापूर्वी स्व. माथानी साल्ढाना यांच्या सहकार्याने भाजपाने आपल्याकडे खेचून इतिहास निर्माण केला होता. त्यानंतर माथानींच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत एलिना साल्ढाना बिनविरोध निवडून आल्या आणि मागच्या निवडणुकीत प्रत्यक्ष रिंगणात उतरून त्यांनी दुसऱयांदा विजय प्राप्त केला. भाजपाचा कुठ्ठाळीतील हा इतिहास विक्रम करणारा ठरला. यंदा एलिना साल्ढाना यांनी भाजपापासून दूर होऊन आम आदमी पार्टीला साथ दिली. त्यामुळे भाजपाला उमेदवार निवडण्यासाठी बरीच वणवण करावी लागली. आणि अखेरच्या क्षणी पक्षाला उमेदवारी देण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्ता सापडला. दहा वर्षे आमदार राहिलेल्या कुठ्ठाळीत यंदा भाजपाची स्थिती म्हणावी तशी नाही. या मतदारसंघात भाजपाविरूध्द नकारात्मक भावना जास्त असल्याचे ऐकू येते. मात्र, भाजपाचे उमेदवार नारायण नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपाला लोकांचा प्रतिसाद लाभलेला असल्याचा विश्वास वाटत आहे. त्यामुळे अटीतटीच्या लढतीत पुन्हा एकदा भाजपा कुठ्ठाळीत यशस्वी होईल अशी त्यांना आशा आहे. परंतु काही कार्यर्त्यांच्या मतानुसार नारायण नाईक यांना उमेदवार म्हणून पक्षाने अखेरच्या क्षणी लोकांसमोर उभे केलेले आहे. याचा फटका भाजपाला बसल्यास नवल नाही.
काँग्रेसच्या एक गठ्ठा मतांना पुन्हा सुरूंग
कुठ्ठाळीत एलिना साल्ढाना यांनी साथ सोडल्याने भाजपाची स्थिती विस्कळीत झाली. त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न अनेक उमेदवारांनी केलेला आहे. एलिना साल्ढाना आपतर्फे लढल्या. मागच्या दहा वर्षांपासून लोकांशी असलेला संपर्क त्यांच्या कामी आला. त्यानाही चांगला प्रतिसाद लाभलेला आहे. मागच्या निवडणुकीत अपक्ष लढून एलिना साल्ढाना यांच्याकडून पाचशे मतांच्या फरकाने हार पत्करावी लागलेल्या आणि दोन वेळा जिल्हा पंचायत सदस्य बनलेल्या अँन्थनी वास यांनी पुन्हा अपक्ष निवडणुक लढवली. त्यामुळे यंदाही त्यांना सर्व पक्षीय मतदार लाभलेला आहे. विजयी उमेदवार म्हणून त्यांच्या नावाचीच जास्त चर्चा आहे. तरीही काही उमेदवारांना यंदा चमत्कार घडेल असे वाटते. मागच्या वेळी आम आदमी पार्टीतर्फे निवडणुक लढवलेल्या ओलान्सीयो सिमोईस यांनी यंदा काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणुक लढवली. काँग्रेसची एकगट्ठा मते कुठ्ठाळीत आजही आहेत. गोव्यात काँग्रेसबाबत थोडीशी हवा निर्माण झाल्याने काँग्रेसलाही विजयाची आशा आहे. यंदा आपबरोबरच तृणमुल काँग्रेसनेही काँग्रसच्या एकगठ्ठा मताना सुरूंग लावलेला आहे. मागच्या वेळी काँग्रेसचे उमेदवार राहिलेले माजी जिल्हा पंचायत सदस्य मारीयान रॉड्रिक्स यंदा तृणमुल काँग्रेसचे उमेदवार आहेत. सांकवाळचे सरपंच व अपक्ष उमेदवार गिरीष पिल्ले या निवडणुकीत महत्वाची भुमिका बजावणार आहेत. त्यांच्या समर्थकांना गिरीष पिल्ले निवडून येतील असे वाटते. गिरीष पिल्ले आणि मारीयान रॉड्रिक्स या दोन उमेदवारांचा अधिक प्रभाव झुआरीनगर परीसरावरच होता असे बोलले जाते. त्यामुळे पिल्ले यांच्या विजयाचा दावा किती खरा ठरू शकतो याबाबत शंकाच आहे.
दोन अपक्ष आणि चार पक्षीय उमेदवारांमध्येच लढत
मागच्या निवडणुकीत कुठ्ठाळीत एकूण 74 टक्के मतदान झाले होते. यंदा 76 टक्के एवढे मतदान झाले. 30,531 मतदारांपैकी 23,427 मतदारांनी मतदान केले. मागच्या वेळी विजयी उमेदवार एलिना साल्ढाना यांना 5,666 एवढी मते मिळाली होती. तर प्रतिस्पर्धी उमेदवार अँन्थनी वास यांना 5,148 एवढी मते मिळाली होती. त्या खालोखाल गिल्बर्ट मारियानो रॉड्रिग्स यांना 4,326, नेली रॉड्रिग्स यांना 3380, ओलेन्सियो सिमोईस यांना 2,482 तर रमाकांत बोरकर यांनी 1,708 एवढी मते मिळवली होती. यंदा कुठ्ठाळी मतदारसंघात भाजपाचे नारायण नाईक, काँग्रेसचे ओलान्सीयो सिमोईस, आपच्या एलिना साल्ढाना, तृणमुल काँग्रेसचे मारीयान रॉड्रिक्स व अपक्ष उमेदवार अँन्थनी वास आणि गिरीष पिल्ले हे उमेदवारच प्रचारात आघाडीवर राहिले. हे उमेदवार हजारो मते खेचणारेच आहेत. लढत या प्रमुख उमेदवारांमध्येच झालेली आहे. या निवडणुकीत आरजीतर्फे तियोतीन डिकॉस्ता, शिवसेनेतर्फे भक्ती खडपकर, अपक्ष विशाल नाईक यांच्यासह एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते. मात्र तिघा उमेदवारांचा कोणताही प्रभाव मतदारांवर दिसून आला नाही.
उमेदवारांच्या गर्दीत अनपेक्षीत घडण्याचीही काहींना अपेक्षा
मागच्या निवडणुकीप्रमाणेच यंदा कुठ्ठाळीत उमेदवारांची भाऊ गर्दी राहिली. मागच्या वेळी मतांच्या ध्रुवीकरणात अनपेक्षीतपणे भाजपाने यश मिळवले होते. यंदाही गोंधळच असल्याने यंदाही अनपेक्षीत घडणार तर नाही ना अशी चर्चाही लोकांमध्ये आहे. मात्र, अपक्ष उमेदवार अँन्थनी वास यांचा विजय झाल्यास तो अनपेक्षीत ठरणार नाही. त्यांचा विजय गृहीत धरून काही राजकीय पक्षांनी सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चाही सुरू केलेली आहे. एका राजकीय पक्षाने म्हणे निवडणुकीपूर्वीच त्यांच्याकडून सहकार्याचे आश्वासन मिळवलेले आहे. आणि त्या पक्षानेही उमेदवार अँथनी वास यांना सहकार्य केलेले आहे.