लोकांचा सूर, कोविडबाधितांच्या कुटुंबसदस्यांची तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी
प्रतिनिधी / कुडचडे
कुडचडेत खांडीवाडा व बेपकेगाळ येथे रविवारी दोन कोविड रुग्ण सापडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. हा बेफिकीरपणाचा परिणाम असल्याची प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त होत असून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सर्वांनी सतर्क राहण्याची गरजही व्यक्त होऊ लागली आहे.
सदर खांडिवाडा येथील व्यक्ती मडगाव येथे एका खासगी कुरिअर आस्थापनामध्ये काम करत असून चार दिवस अगोदर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती व अहवाल येणे बाकी होते. तरी सदर व्यक्ती घरी न थांबता परिसरात फिरली तसेच त्याच्यासोबत त्याची मित्रमंडळी होती, अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर सदर मित्रमंडळीनी एकत्र येऊन वाढदिवसही साजरा केल्याची माहिती परिसरात पसरली आहे. त्यामुळे भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुटुंब सदस्यांसह संपर्कात आलेल्यांची चाचणी
सध्या खांडिवाडा येथील रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना चाचणीसाठी कुडचडे प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावून घेतले गेले असून त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वतःची चाचणी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्व जणांनी पेंद्रात सोमवारी उपस्थिती लावली होती. त्याचबरोबर खांडिवाडा येथे कोरोना रुग्ण मिळाल्याची दखल घेत कुडचडे अग्निशामक दलाने सदर परिसरात तसेच चंद्रभागा तुकोबा नाईक उच्च माध्यमिक विद्यालय व हायस्कूल परिसरात निर्जंतुकीकरण मोहीम राबविली आहे.
लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त
कोरोनामुक्त असलेल्या कुडचडेत रुग्ण सापडल्याने जे भय लोकांमध्ये निर्माण झाले आहे ते साहजिक आहे. लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असून विनाकारण परिसरात फिरू नये, घातलेल्या अटींचे पालन करावे व आपल्या मित्रमंडळीलाही सदर अटी पाळण्यासाठी मार्गदर्शन करावे. स्थानिक आमदारांनीही लक्ष घालून संबंधित यंत्रणा सक्रिय कराव्यात, अशी मागणी स्थानिकाकडून होत आहे.
शासकीय यंत्रणांनी कडक धोरण पत्करावे कुडचडेत अचानक दोन कोरोनाबाधित सापडल्याने हा विषय गंभीर झाला आहे. त्यामुळे लोकांनी आधीसारखे न वावरता संयमाने व्यवहार करावा. कारण कोरोना विषाणू हा संसर्गाच्या बाबतीत कोणतेच बंधन पाळत नाही. तरीही कुडचडेत अजूनपर्यंत स्थिती चांगली आहे. याचवेळी संबंधित शासकीय यंत्रणांनी कडक धोरण पत्करावे. तसेच लॉकडाऊन न करता जनतेला कोरोनाविषयक अटी पाळण्याच्या बाबतीत मार्गदर्शन करण्याची अत्यंत गरज आहे, अशी प्रतिक्रिया शिवयोद्धा संघर्ष युनिटचे अध्यक्ष विनेश प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली आहे.