नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाळकृष्ण होडारकर यांची विश्वास सावंत यांच्यावर एका मताने मात : लगेच नवनिर्वाचित नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल
प्रतिनिधी / कुडचडे
कुडचडे-काकोडा पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत बाळकृष्ण होडारकर यांनी विश्वास सावंत यांना एका मताने हरवून नगराध्यक्षपदी आपली वर्णी लावली. पण त्यानंतर अवघ्या एका तासाच्या आत पराभूत झालेल्या सावंत यांनी आपल्या पॅनलसोबत बैठक घेऊन होडारकर यांच्यावर अविश्वास ठराव आणला. सदर ठरावाची नोटीस पणजीतील पालिका संचालक कार्यालयात सादर करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.
कुडचडेत गुरुवारी ज्या नाटय़पूर्ण घडामोडी घडल्या त्यांनी स्थानिक आमदार असलेले वीजमंत्री नीलेश काब्राल यांना धक्का दिलेला आहे. निवडणूक निकालानंतर बहुतांश जिंकून आलेले नगरसेवक भाजपाचे असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जे काही घडले त्यातून त्यांचा दावा कोसळला असून त्यांना चांगलाच धडा शिकविण्यात आला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराची हार
कुडचडे-काकोडा पालिकेसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर कुडचडेतील लोकांची नजर नगराध्यक्षपद कोण भूषवेल याकडे लागून होती. गुरुवारी सकाळी निर्वाचन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे धारबांदोडाचे उपजिल्हाधिकारी केदार नाईक यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुकीत भाजप समर्थक विश्वास सावंत हे एक मताच्या फरकाने हरले. तर उपगराध्यक्षपदी रूचा वस्त या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.
निवडणुकीच्या वेळी मंत्री काब्राल, मुख्याधिकारी अजय गावडे, विश्वास सावंत, रूचा वस्त, दामोदर भेंडे, सुशांत नाईक, मंगलदास घाडी, अपर्णा प्रभुदेसाई, बाळकृष्ण होडारकर, टोनी कुतिन्हो, प्रदीप नाईक, फर्नांडिस, जस्मिन ब्रागांझा, प्रमोद नाईक, योलोंदा पेरेरा, रिमा एलिस, क्लेमेंटिना फर्नांडिस यांची उपस्थिती होते.
काब्राल यांच्या कार्यालयातील बैठकीनंतर निर्णय
निवडणूक सोपस्कार पूर्ण होतात तोच अचानक एका तासाच्या आत सावंत व त्याचे 9 सहकारी नगरसेवक यांची मंत्री काब्राल यांच्या कार्यालयात बैठक झाली. त्यात होडारकर यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अविश्वास ठराव आणण्याचे कारण विचारले असता उत्तर देताना त्यांनी सांगितले की, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आधी आपले 10 जणांचे पॅनल होते. पण निवडणुकीत सदर पॅनलमधील तीन नगरसेवकांनी गद्दारी केली व आपल्या विरोधात मतदान केले. तसेच ही निवडणूक झाल्यावर सदर नगरसेवक आपण घेतलेल्या बैठकीसही उपस्थित होते. असा खेळ खेळत असलेल्या खेळाडूंची आपण लवकरच खबर घेणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकांमध्ये पडसाद सध्या कुडचडेत घडलेल्या घडामोडींबद्दल विविध प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकू येऊ लागल्या आहेत. त्यात भारतीय जनता पक्षाने पालिका निवडणुकीच्या आधी आपले पॅनल जाहीर केले असते, तर अशी वेळ आली नसती. तसेच निवडणुकीत विजयी झालेल्या नगराध्यक्षांवर लगेच अविश्वास ठराव आणणे हे खालच्या स्तरावरचे राजकारण आहे, अशी मते लोक व्यक्त करताना दिसत आहेत. सदर निवडीवेळी मंत्री काब्राल येताना दहा नगरसेवक घेऊन आले होते. पण जाताना फक्त सात नगरसेवक घेऊन गेले व आपल्यासमोरच नगराध्यक्षपदी होडारकर यांना निवडून दिलेल्या काही नगरसेवकांना घेऊन नंतर नवीन नगराध्यक्षांविरुध्द अविश्वास ठरावाचा डाव रचला. हे कोणते राजकारण आहे, असा प्रश्न लोकांकडून विचारण्यात येत आहे.
अविश्वास ठराव आणणाऱयांना कायद्याचे ज्ञान नाही ; दिगंबर कामत
कुडचडे-काकोडा नगरपालिकेत काल गुरूवारी नव्या नगराध्यक्षाची निवड करण्यात आली व अवघ्या काही वेळेत त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा प्रकार घडला. या प्रकारावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ज्यांनी कोणी अविश्वास ठराव दाखल केला त्यांना कायदय़ाचे ज्ञान नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
नगराध्यक्षपद व उपनगराध्यक्षपदासाठी अद्याप अधिसूचना जारी होणे बाकी आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे, निर्वाचन अधिकाऱयांनी पालिका संचालकांना अहवाल सादर केला पाहिजे व त्यानंतर पालिका संचालकांनी अधिसूचना जारी केली पाहिजे. त्यानंतर निवडून आलेले नगरसेवक शपथ घेणार, त्यानंतर पालिका मंडळाची पहिली बैठक होणार आणि त्यानंतरच इतर सर्व सोपस्कार केले जातात. या सर्व गोष्टी व्हायच्या बाकी असतानाच अविश्वास ठराव दाखल करणे कायदय़ात बसू शकत नाही, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले.
काल जरी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली तरी त्याला अधिकृत मान्यता मिळालेली नाही. त्यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी झालेली नाही. अशावेळी अस्तित्वात नसलेल्या नगराध्यक्षावर कसा काय अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो, असा सवालही कामत यांनी उपस्थित केला आहे.
ही लोकशाहीची थट्टाच
जो प्रकार कुडचडे-काकोडा पालिकेत घडला याला लोकशाही म्हणायची का? असा सवाल देखील विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित करून सत्तेवरील भाजप सरकारने लोकशाहीची थट्टय़ाच चालविल्याचा आरोप केला. कुडचडे-काकोडा पालिका क्षेत्रातील लोकांना काय चाललेय हे कळले पाहिजे. नव्याने नगराध्यक्ष झालेल्यांना किमान सहा महिने तरी काम करण्याची संधी मिळायला पाहिजे. परंतु सत्ता असल्याने काहीही होत असते, हेच कालच्या घटनेतून स्पष्ट झाल्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले.
कुडचडे-काकोडा पालिकेत लोकशाहीचा खून : विजय सरदेसाई
कुडचडे-काकोडा नगरपालिकेत काल जो काही प्रकार घडला, तो लोकशाहीचा खूनच असल्याची तीव्र प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. आपण गेल्या अनेक महिन्यापासून जे काही बोलत होतो, त्यावर कालच्या घटनेने शिक्का मोतर्ब केले आहे. भाजप लोकशाही तत्त्वावर विश्वास ठेवत नाही असे श्री. सरदेसाई म्हणाले.
कुडचडे-काकोडा पालिकेत भाजपचे मंडळ आल्याचा दावा स्थानिक आमदार तथा वीजमंत्री निलेश काब्राल करीत होते. त्या दाव्याचा कालच्या घटनेतून पर्दाफाश झाला. मंत्री काब्राल यांना मिळालेली ही जबरदस्त चपराक होय. नगराध्यक्षपदासाठी कुडचडे भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास सावंत यांना पुढे करण्यात आले होते. परंतु, बाळकृष्ण होडारकर यांनी त्याचा पराभव केला. मंत्री निलेश काब्राल यांनी एक दिवस अगोदरच सांगितले होते की, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुणीही भाग घेऊ शकतो. आपल्या पॅनलने सावंत यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, होडारकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने कोण जिंकतो हे पाहूया. आणि काल निवडणुकीत होडारकर हे विजयी झाले आणि भाजप मंडळाच्या अध्यक्षांना पराभवचा सामना करावा लागला. मंत्री काब्राल यांना हा प्रकार सहन झाला नाही. त्यांनी भाजप समर्थित पॅनलवर नि÷ा असल्याचा दावा करणाऱया सर्व नगरसेवकांवर कडक टीका केली. अविश्वास ठरावावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले व कालच मनपा प्रशासनाच्या संचालकांकडे सादर करण्यास भाग पाडले असे श्री. सरदेसाई यांनी म्हटले आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला नसताना, 9 नगरसेवकांना अविश्वास ठराव का घालण्यास भाग पाडले हे मंत्री काब्राल यांनी गोव्यातील लोकांना समजावून सांगितले पाहिजे. नगराध्यक्षांनी काम करणे सुरू केले नाही अशा परिस्थितीत मंत्री काब्ा्राल यांची दादागिरी स्वीकारली जाऊ शकत नाही. गोवा फॉरवर्डची मागणी आहे की अविश्वास दाखविण्याचा हा प्रस्ताव त्वरित डीएमएने फेटाळून लावावा आणि होडारकर यांच्या निवडीला कोणतीही विलंब न करता अधिसूचित केले जावे. होडारकर यांना कुडचडे-काकोडा पालिकेची नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची मुभा देण्यात आली नाही, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. ‘नीलेश काब्राल यांनी कायदेशीररीत्या निवडलेल्या नगरपालिकांच्या नगराध्यक्षांना खाली आणण्याऐवजी मंत्री म्हणून आपल्या कर्तव्यासाठी अधिक वेळ घालवला पाहिजे. गोव्याला कोळशाचे केंद्र बनवण्याच्या प्रयत्नांना त्यांनी प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे प्रयत्न थांबवले पाहिजेत आणि गोव्यासाठी लोककेंद्रित कोस्टल झोन मॅनेजमेंट योजना देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. निवडून आलेल्या नगरसेवकांनी अध्यक्षपदी कोणालाही निवडण्याचा निर्णय घ्यावा आणि ठरवावा, आणि कायद्याने निवडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामात मंत्र्यांना हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही’ असे ही विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.