प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे-काकोडा पालिका कुडचडेतील बाजारकराना भेडसावत असलेली भटक्या गुरांची अडचण सोडविण्यात याअगोदर यशस्वी झाली नव्हती आणि आताही अयशस्वीच होत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या महिन्यात गणेश चतुर्थीचा बाजार संपूर्णपणे भरला असता या बाजारात आलेल्या ग्राहकांना व व्यापाऱयांना गुरांमुळे नाहक त्रास सहन करावा लागला होता. बाजारात फिरणाऱया गुरांना कोणीच वाली नसल्याने ती बऱयाचदा लोकांच्या दुचाक्यांना लावलेल्या पिशव्या खेचून त्यातील महत्त्वाच्या वस्तू रस्त्यावर टाकतात. त्यामुळे लोकांचे भरपूर नुकसान होण्याचे प्रकार अजूनही चालू आहेत.
याचे कारण सध्या या गुरांना हवे असलेले खाद्य मिळत नसल्यामुळे ती गुरे कोणत्याही वस्तू खाण्यास मागेपुढे पाहत नाहीत. दुकानांच्या बाहेर ठेवलेल्या कोणत्याही वस्तू खेचून त्या खराब करून त्यांच्याकडून रस्त्यावर टाकल्या जातात. यामुळे हजारो रुपयांचे नुकसान याअगोदर दुकानदारांना सहन करावे लागले आहे व आताही लागत आहे. त्यामुळे बाजारातील ग्राहकांबरोबर दुकानदारांनीही कुडचडे-काकोडा पालिकेच्या बेशिस्त काराभारावर टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेत सदर भटकी गुरे हाताळण्यासाठी एक व्यक्ती नियुक्त केलेली असताना अशा अडचणींना का सामोरे जावे लागत आहे, असा प्रश्न लोकांकडून विचारला जात आहे. पालिका मुख्याधिकाऱयांनी या समस्येवर ताबडतोब उपाययोजना करावी, अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे