सरपंचांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत सावर्डे भाजप अध्यक्षांकडे कामगारांची मागणी : मुख्यमंत्र्यांसमोर विषय मांडा
प्रतिनिधी /कुडचडे
कुड्डेगाळ येथील फोमेंतोच्या 219 कामगारांचा 2015 पासून जो प्रश्न रखडलेला आहे तो येत्या आठ दिवसांच्या आत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमोर मांडून त्यावर कायमचा तोडगा काढावा अशी मागणी सावर्डे भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई यांच्याकडे तोंडी स्वरूपात केल्याची माहिती स्थानिक कामगार संघटनेचे अध्यक्ष आशेंद्र वेळीप यांनी या प्रतिनिधीला दिली. यावेळी त्यांच्यासोबत संघटनेचे सचिव नीलेश नाईक, थॉमस डिकॉस्ता व विश्वास वेळीप उपस्थित होते.
सदर प्रश्न सुटत नसल्यामुळे ज्यावेळी कामगारांनी ई-लिलाव मालवाहतूक रोखण्यासाठी आमरण उपोषण पुकारले तेव्हा बऱयाच घडामोडी झाल्या. कामगारांना कोलवाळ तुरुंगाच्या दरवाजापर्यंत नेले व परत आणून कंपनी गेटवर सोडले. त्यावेळी सदर आंदोलन मागे घेण्यासाठी विलास देसाई, कालेचे सरपंच किशोर देसाई, करमणेचे पंच भानुदास गावकर यांनी मध्यस्थी करून कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्यांची पूर्तता करून देणार असे आश्वासन दिले होते. पण सध्या स्थिती वेगळीच झाली असून यासंबंधी ज्यांनी जबाबदारी स्वीकारली होती ते मंत्री नीलेश काब्रालही हात वर काढू लागले आहेत, असे वेळीप यांनी सांगितले.
त्यामुळे सर्व कामगार एकत्र होऊन सातही पंचायतींच्या सरपंचांना बोलावून विलास देसाई यांच्याबरोबर सोमवारी संध्याकाळी बैठक घेतली गेली, यावेळी धारबांदोडाचे सरपंच बालाजी गावस, कुळेचे मणी लांबोर, नीलेश मापारी, दाभाळचे रमाकांत गावकर, शशिकांत गावकर, नरेश शिगावकर, भानुदास गावकर, कालेचे किशोर देसाई व सर्व कामगार उपस्थित होते. त्यात विलास देसाई यांच्यासमोर वरील तोंडी निवेदन करण्यात आले. काहीही करा, पण जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करून द्यावे असे सांगितले असल्याची माहिती वेळीप यांनी दिली.
स्थानिक आमदारांकडून आश्वासनावर पाणी
आज या विषयाला सहा वर्षे पूर्ण व्हायला आली आहेत. त्यात तीन मुख्यमंत्री झाले, तेही भारतीय जनता पक्षाचे. पण कामगारांचा हा छोटासा मुद्दा सोडविण्यात ते असफल झालेले आहेत. ज्या वेळेस कामगारांनी आंदोलन पुकारले होते त्यावेळी सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर व त्यांचे सरपंच असलेले बंधू यांनी कंपनीच्या गेटवर सांगितले होते की, जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कुड्डेगाळ येथील फोमेंतो कंपनीतून एक कण सुद्धा माल बाहेर काढू देणार नाही. पण सदर ई-लिलाव मालवाहतुकीचे कंत्राट खुद्द संदीप पाऊसकर यांना मिळाल्यामुळे त्यांनी कामगारांना दिलेल्या आश्वासनावर पाणी फेरलेले आहे. ही आहे सावर्डेच्या आमदारांची जनतेला सेवा, असा दावा त्यांनी यावेळी केला.
काब्रालकडूनही आश्वासन अपूर्ण
काही महिने अगोदर मुख्यमंत्री सावंत यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मंत्री पाऊसकर, काब्राल, विलास देसाई, किशोर देसाई व इतरांच्या उपस्थितीत या विषयावर चर्चा करण्यात आली होती. तेव्हा काब्राल यांनी कामगारांनी मागणी केलेली सर्व थकबाकी सहा हप्त्यांत देऊ असे सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी एक हप्ता दिला. त्यानंतर ई-लिलाव मालवाहतूक सुरु करण्यात आली. आता मान्सून सुरू झाला असून ई-लिलाव मालवाहतुकीचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे मालवाहतूक बंद झाली आहे. पण थकबाकी हप्त्यांमध्ये देण्याचे जे आश्वासन काब्राल यांनी दिले होते ते त्यांनी पूर्ण केलेले नाही. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितले की, कंपनी पैसे देत नाही, त्यामुळे आपण सदर पैसे देऊ शकत नाही, असे नीलेश नाईक यांनी सांगितले.
मंत्र्यांवर विश्वास नाही
तसेच काब्राल हे वेगवेगळी कारणे सांगून कामगारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण ज्यावेळी सहा हप्ते देण्याचे ठरविले होते तेव्हा न्यायालयात दाखल झालेली याचिका परत घेण्यासंबंधी काहीच बोलणी झालेली नव्हती. पण आता ते सदर याचिका मागे घ्या म्हणून सांगत आहेत. हे चुकीचे असून ते कामगारांचा एक प्रकारे विश्वासघात करत आहेत, असा दावा नाईक यांनी यावेळी केला. त्यामुळे आता कामगारांना या दोन्ही मंत्र्यांवर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे ज्यांनी आंदोलन मागे घेण्यास कामगारांना सांगितले होते व मागण्या पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले होते त्या विलास देसाई यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली आहे व त्यांना हा मुद्दा एका आठवडय़ात सोडविण्यास सांगितलेले आहे. प्रत्येक वेळी निवडणूक होण्याच्या अगोदर आमदार कामगारांना सांगत आले आहेत की, तुमच्या मागण्या पूर्ण करू. पण त्यांनी ते केलेले नाही. कामगारांची भाजपकडे कोणतीच दुश्मनी नाही. पण जर कामगारांच्या मागण्यांची आठ दिवसांत पूर्तता केली गेली नाही, तर परिणामांसाठी कामगारांना जबाबदार ठरवू नये. याची नोंद सरकारने घ्यावी, असे ते म्हणाले.
आज कुड्डेगाळ येथील फोमेंतोच्या या कामगारांची अशी स्थिती व्हायला फक्त सरकार जबाबदार आहे. याअगोदर आम्ही सावर्डेचे आमदार पाऊसकर यांना निवडणुकीत पूर्ण पाठिंबा दिला व निवडून आणले. पण त्यांनीही आमच्याकडे पाठ केलेली आहे. त्यानंतर विलास देसाई, किशोर देसाई, भानुदास गावकर यांनी आंदोलनाच्या वेळी कामगारांना मंत्री काब्राल यांच्याजवळ आणले व तेही जे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेले आहेत. तरी मुख्यमंत्र्यांना एकच निवेदन करतो की, कामगारांना अशा प्रकारे सतावू नका. अन्यथा याचे परिणाम काय होतील ते आपण आता सांगू शकत नाही, असे वेळीप म्हणाले.