सर्वांसाठी लस उपलब्ध करून देण्यात सरकारला अपयश : लसीकरण केंद्रांवर कोणाचेच नियंत्रण नाही
कोरोनाला रोखायचे तर लस घ्या, असे सरकार सांगते. परंतु ही लस सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात सरकारला अपयश आले आहे. नागरिकांच्या तुलनेमध्ये लसपुरवठा पुरेसा नसल्याने समस्या निर्माण होत आहे. परिणामी हतबल झालेले नागरिक लसीकरण केंद्रासमोर ‘कुणी लस देता का लस?’ अशी विचारणा करत आहेत.
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाने गेल्या दोन वर्षात निर्माण केलेली धास्ती व त्यामुळे दगावलेले लोक यांची संख्या पाहता नागरिक कोणत्याही परिस्थितीत लस घेण्यासाठी आटापिटा करीत आहेत. पूर्वी 45 ते 60, त्यानंतर 18 वर्षांवरील सर्वांना लस बंधनकारक आहे असे सरकारने जाहीर केले. त्यामुळे लसीकरण केंद्रांसमोर कमालीची गर्दी होऊ लागली.
लवकरच शाळा व महाविद्यालये सुरू करण्याबाबत सरकार सुतोवाच करत आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लस अत्यावश्यक असल्याचेही तज्ञ सांगत आहेत. परिणामी पालक चिंतातूर झाले असून, आपल्या मुलांना लस मिळावी यासाठी त्यांची पायपीट सुरू आहे. सरकारने प्रथम ऑनलाईन नोंदणी करण्याची सूचना केली. सर्वप्रथम ज्ये÷ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. दुर्दैवाने ज्ये÷ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी कोणतीच वेगळी व्यवस्था ना सरकारने केली, ना प्रशासनाने.
पहाटेपासूनच लसीकरण केंद्रांवर रांगा
यामुळे पहाटेपासूनच लसीकरण केंद्रांवर रांगा लागत आहेत. बिम्समध्ये लसीकरणासाठी वाढती गर्दी आहे. परंतु नागरिकांच्या तुलनेत बिम्समध्ये पुरेशी लस नाही असे बिम्सचे प्रभारी संचालक सांगतात. दुसरीकडे आरोग्य खाते लसीचा पुरवठा पुरेसा नाही, असे स्पष्ट करतात. लसीकरण केंद्रांवर कोणाचेच नियंत्रण नाही. तेथे परिचितांना आधी प्रवेश मिळतो, तेथे शिस्तीचा पूर्ण अभाव आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना कोणीच वाली नाही, असे केंद्रांवरील नागरिक सांगत आहेत. शिवाय खासगी हॉस्पिटल्समध्ये असणारा लसीचा दर सामान्यांना परवडणारा नाही. एकूणच हे दुष्टचक्र असेच सुरू आहे आणि बिचारे नागरिक त्याचे लक्ष्य होत आहेत.
लसीकरणासाठी आरोग्य खात्याने विविध उपक्रम हाती घेतले होते. नागरिकांना लस देण्यासाठी स्व-साहाय्य संघटना व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लसीकरण शिबिरे आयोजित केली होती. तेथे नागरिकांची गर्दी होत आहे. परंतु त्यालाही मर्यादा आहेत. सध्या सर्वच केंद्रात लस उपलब्ध नसल्याने ‘नो स्टॉक’चे फलक लावण्यात आले आहेत. काही केंद्रांमध्ये केवळ लसीचा दुसरा डोस देण्यात येत आहे. तशा प्रकारचा फलक आरोग्य केंद्रावर लावण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 12 लाख 71 हजार 360 नागरिकांना लस देण्यात आली आहे. पहिला डोस दिलेल्या नागरिकांना दुसरा डोस देणे बंधनकारक असल्याने पहिला डोस देण्याचे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पहिला डोस घेण्यासाठी नगर आरोग्य केंद्रात जाणाऱया नागरिकांना लस न घेताच परतावे लागत आहे.