सर्टिफिकेटसाठी सिव्हिलवर गर्दी : शहरातील डॉक्टर्संनी घेतले झोपेचे सोंग
प्रतिनिधी/ सातारा
लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर हजारो परप्रांतिय मजूर, कामगार सातारा जिल्हय़ासह सातारा शहर परिसरात अडकून पडले. त्यांची शासनाने निवारा केंद्रात सोय केली पण प्रत्येक कामगाराला ओढ आहे आपल्या घराकडे जाण्याची. प्रशासनाने त्यासाठी नावनोंदणीची प्रक्रिया सुरु केली असून वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना शारीरीक फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर ते आपापल्या गावी जावू शकतील. मात्र, हजारोंच्या संख्येने असलेल्या कामगारांवर मात्र कुणी आम्हाला सर्टिफिकेट देता का? सर्टिफिकेट ? असा आर्त टाहो फोडण्याची वेळ आलीय. सर्टिफिकेट खासगी प्रॅक्टिस करणाऱया डॉक्टर्सनी दिले तरी चालते मात्र सिव्हिलवर प्रचंड गर्दी होत असल्याने रुग्णालय यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
सातारा जिह्यात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. जिल्हा शंभरीकडे चालला असल्याने कोरोना टाळण्यासाठी सामाजिक अंतर अत्यावश्यक आहे. मात्र सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर बुधवारी कामगारांची तोबा गर्दी झाली होती. दोन हजार पेक्षा जास्त लोक जमा झाल्याचे दिसून आले यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाळावे लागणाऱया सामाजिक अंतराचा पुरता फज्जा उडवला गेला. आता या स्थितीला कोणाला जबाबदार धरणार हा सर्व प्रकार म्हण्जे बेजबाबदार प्रशासनाचा हा अजब नमुना आहे.
जिल्हा प्रशासनाने सातारा जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हय़ात जाणाऱयांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. त्यावर माहिती भरल्यानंतर अशा नागरिकांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळणार असून त्यासोबत जिल्हा रुग्णालय तसेच खासगी हॉस्पिटलकडून वैद्यकीय तपासणी केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. परवानगी व फिटनेस सर्टिफिकेटनंतर त्यांची जाण्याची सोय प्रशासन करणार असल्याने अशा लोकांनी सर्टिफिकेट घेण्यासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतलीय आहे.
सध्या सातारा शहरातील अनेक दवाखाने बंद असल्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे पत्रकार परिषदेत तक्रारही करण्यात आली आहे. वास्तविक शहरातील डॉक्टर्संनी या कामगारांची आवश्यक काळजी घेवून त्यांची तपासणी करुन त्यांना सर्टिफिकेट दिल्यास जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होईल मात्र कोरोना विरुध्दच्या लढाईत माणुसकीचे भान विसरलेल्या डॉक्टर नावाच्या देवांना कोण समजवणार ? त्यामुळेच भूमीपुत्र संघटनेने अशा डॉक्टर्सवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.
सिव्हीलमध्ये सोशल डिस्टिन्सचा फज्जा
कुणाला बाहेर जायचंय ,कुणाला लग्नाला जायचंय ,अशी नाना कारणे सांगत हे लोक तपासणीसाठी सिव्हीलमध्ये दाखल झाले आहेत. तथापि, फिजिकल डिस्टंन्सिग पाळायला लावणे यासाठी सिव्हिल प्रशासन काहीच करताना दिसत नाही. इथे सेक्युरिटी गार्ड नाही की डॉक्टरही नाही. त्यामुळे हा बेजबाबदारपणा सातायाला अधिक संकटात टाकणार आहे.
जिल्हाधिकारीसाहेब ऍक्शन घ्या
परप्रांतियांचे सर्टिफिकेट असो वा कंटेन्मेंट झोनमधील घरपोच सेवा सुविधा असो काहीतरी अडचणी या आहेतच. खरंच ज्यांना गरज आहे त्यांना अत्यावश्यक वस्तू मिळत नसल्याने नागरिक पॅनिक आहेत. तर मेडिकल सेवा अत्यावश्यक सेवा असून एकीकडे दवाखाने, नर्सिंग होम सुरु ठेवायचे दुसरीकडे शहरातील मेडिकल सेवा घरपोच करायची जी शक्य नाही. त्यात बदल करावा लागेल. नागरिकांनी देखील यापुढे प्रशासनाने सवलत दिल्यास मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, शिस्तबध्दपणे सहकार्याची भावना जपणे या गोष्टी करणे आवश्यक असून जिल्हाधिकारी साहेब यावर कृतीशील तोडगा काढा, अशी मागणी होत आहे.