मालवण सुरक्षित अन् पर्यटनातील हिरा! : पर्यावरण रक्षण, स्वच्छता अन् पर्यावरणपूरक पर्यटनाचे देतोय धडे
महेंद्र पराडकर / मालवण:
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे मालवणात देशी-विदेशी पर्यटकांची ये-जा ठप्प झाली असताना एक विदेशी तरुण मात्र सध्या मालवणवासीयांचे लक्ष वेधून घेतोय. दोन गावठी कुत्र्यांना सोबत घेऊन मालवणच्या रस्त्यांवर फिरणारा हा तरुण सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क लावून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळतो अन् आपल्या कृतीतून इतरांनाही सुरक्षित अंतराचे महत्व पटवून देते. पबलो वायडल असे या 39 वर्षीय तरुणाचे नाव असून तो स्पेनचा रहिवासी आहे. गेले नऊ महिने तो मालवणात वास्तव्य करून आहे. ‘वेद’ आणि ‘मुक्ती’ अशी त्याच्या कुत्र्यांची नावे आहेत. लॉकडाऊनच्या काळात सातासमुद्रापलिकडे राहून तो जणू वेदनामुक्तीचा संदेशच इतरांना देऊ पाहतोय.
पबलो हा इंडस्ट्रियल डिझायनर असून ही त्याची तिसरी भारत भेट आहे. पहिल्या भारत दौऱयात तो उत्तर भारतात विशेष करून दिल्ली, आग्रा येथे स्थिरावला होता. दुसऱया भारत भेटीत त्याने केरळमध्ये पर्यटनाचा आनंद घेतला. तिसऱया दौऱयात तो आपल्या स्पॅनिश मित्रासमवेत गोव्याहून मालवणात आला. जानेवारीत त्यांची मालवण सफर सुरू झाली. दोन महिन्यांपूर्वी त्याचा मित्र मायदेशी परतला. मात्र, पबलोने स्पेनला परतण्याचा अद्याप कुठलाही बेत आखलेला नाही. स्पेनला परत जायचे योग्य कारणच मिळत नाही, असे तो म्हणतो. कोरोना संक्रमण काळात व्हिजासंदर्भात आपल्याला फारशा अडचणी आल्या नाहीत. याचे समाधान तो व्यक्त करतो. तो सध्या रेवतळे येथे एका घरात भाडय़ाने राहत आहे.
कसे पर्यटन हवे हे आताच ठरवा?
मालवण सुरक्षित पर्यटनस्थळ आहे. पर्यटनदृष्टय़ा मालवण हा ‘हिरा’ आहे. मात्र, त्याला पैलू कसे पाडले पाहिजेत, कसे पर्यटन आपल्याला हवे हे येथील लोकांनी वेळीच ठरविले पाहिजे, अशी सूचना पबलो करतो. त्याच्या मते, मालवणला अमाप निसर्गसंपदा तर लाभली आहेच. शिवाय मालवणला मोठा ऐतिहासीक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. जुन्या पद्धतीची बांधकामेही लक्षवेधी आहेत. त्यांचे जतन व्हायला हवे. निसर्गपूरक व सांस्कृतिक वारसा जपणाऱया पर्यटनाला चालना देण्याचे सामर्थ्य मालवणमध्ये आहे. ते व्यवस्थित जपले गेले पाहिजे. माझ्या युरोपियन मित्रांना जेव्हा मी या ठिकाणचे फोटो आणि व्हीडिओ पाठवितो, तेव्हा ही जागा कुठे आहे, असे कुतुहलाने ते विचारतात, असे पबलो नमूद करतो.
समुद्र किनाऱयांची स्वच्छता महत्वाची
मालवणात एकापेक्षा एक सुंदर समुद्र किनारे आहेत. कोळंब हा माझ्या सर्वात आवडीचा समुद्र किनारा आहे. पण तेथे वाहून येणाऱया प्लास्टिक व काचेच्या बॉटल्स् तसेच रबरयुक्त कचरा पाहिला की मनाला तीव्र वेदना होतात. चिवला समुद्र किनारी फेरफटका मारायला गेलो, की तेथील समुद्र किनारा स्वच्छतेला मी प्राधान्य देतो. प्लास्टिक कचऱयामुळे मानवासह पशु-पक्ष्यांच्याही आरोग्याचे प्रश्न निर्माण होतातच. जमिनीचा पोतही बिघडतो. जल व वायू प्रदूषणासही प्लास्टिक कचरा कारणीभूत ठरतो. भविष्यातील धोके टाळण्यासाठी स्वच्छता गांभीर्याने घेणे आवश्यक आहे, असे पबलो म्हणतो. पर्यावरण विषयावर पबलोने जय गणेश इंग्लिश स्कूल येथे व्याख्यानही दिले आहे. मामा वरेरकर नाटय़गृहात जानेवारीत झालेल्या ‘ग्रीन थिएटर फेस्टिव्हल’मध्येही त्याला मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
कुत्र्यांमधून ‘वेद‘ना’-मुक्ती’
कुत्रे पालन हा आमचा स्थायीभाव आहे. माझा मित्र एन्रीकला काळय़ा रंगाचा कुत्रा काही महिन्यांपूर्वी जखमी अवस्थेत रस्त्यावर विव्हळताना दिसला. त्याला घरी आणून आम्ही त्याच्यावर उपचार केले. तर दुसऱया कुत्र्याला त्वचेचा आजार होता. त्याच्यावरही आम्ही उपचार केले. आज ते माझे सोबती बनले आहेत. काळय़ा कुत्र्याचे नाव वेद, तर पांढऱया कुत्र्याचे नाव मुक्ती ठेवले आहे, असे पबलो आनंदाने सांगतो अन् ‘गावठी कुत्रा’ हा शब्दही उच्चारतो. हिंदी, मराठीतील काही शब्द तो आवर्जून बोलतो. या दोन्ही भाषांमध्ये असलेले साम्यही त्याला ज्ञात आहे.