कुपवाड/प्रतिनिधी
कुपवाड शहरातील आठवडा बाजारात गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ माजवला आहे. याकडे कुपवाड पोलिसांचे दुर्लक्ष होत असून प्रत्येक ठिकाणच्या आठवडा बाजारात गस्त वाढवून।मोबाईल चोरटयांवर पोलिसांनी करडी नजर ठेवावी, अशी मागणी होत आहे.
कुपवाड महापालिका क्षेत्रात तसेच बामनोली परिसरात आठवडा बाजारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कुपवाडमधील आर. पी.पाटील चौक, लाडले मशायक दर्गा परिसर, अहिल्यानगर व बामनोली आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. बाजारात भाजीपाला खरेदीसाठी महिला व पुरुषांची वर्दळ असल्याने घाईगडबडीत असलेल्या ग्राहकांच्या जवळील पैशाचे पाकिट, दागिने अथवा मोबाईल चोरीकडे चोरट्यांचे लक्ष असते. सावध हेरुन आठवडा बाजारात मोबाईल चोरीच्या असंख्य घटना घडत आहेत. त्यापैकी मोजक्याच घटना पोलिसात नोंद होतात.
वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी सायंकाळी येथील मुख्य आर.पी.पाटील चौकातील आठवडा बाजारात चोरट्यांनी नुकतीच एका महिलेची पर्समध्ये ठेवलेला मोबाईल व रोकड चोरल्याची घटना उघड़किस आली आहे. शहरातील महादेवी सुभाष कुरणे (रा.रामकृष्णनगर) ही महिला मंगळवारी सायंकाळी भाजी खरेदी करीत असताना अज्ञाताने पिशवीत पर्समध्ये ठेवलेला मोबाईल व रोख रक्कम असा ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरला. याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली आहे. मात्र, चोरट्यांना पकडण्यात कुपवाड पोलिसांना अद्याप यश आले नाही. कुपवाड पोलिसांनी आठवडा बाजारातील वाढत्या चोऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन पोलिसांची गस्त वाढवून चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी कुपवाडमधील त्रस्त नागरिकांतून जोरदार मागणी होत आहे.