नव्या टाक्या बांधल्या तरीही पाणी समस्या गंभीर
कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडवर विकासकामाबाबतीत नेहमीच अन्याय होत आहे. आता पिण्याच्या पाणी वाटपातही अन्याय सुरु आहे. कुपवाडसाठी स्वतंत्र नव्या पाण्याच्या टाक्या बांधल्या, पाइपलाइन केली, तरीही पाणी समस्या अद्याप गंभीरच आहे. कुपवाडच्या वाटयाचे पाणी राजरोसपणे सांगलीला पळवले जात असल्याचा आरोप गुरुवारी पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत नगरसेवकांनी केला.
दरम्यान, पाणी पुरवठयाच्या नियोजन आणि फेर आढावा घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांसमवेत पुन्हा सोमवारी बैठक घेणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड़ यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.
प्रभाग समिती तीनमधील प्रशासनाविरोधात तक्रारी वाढू लागल्याने आयुक्त नितीन कापडनीस यांनी बुधवारी कुपवाड विभागीय कार्यालयास अचानक भेट देऊन पाणीपट्टी, घरपट्टी, बांधकाम, नगररचना व स्ट्रीट लाईट विभागाची झाड़ाझडती घेतली. या पार्श्वभूमिवर नियोजनासाठी गुरुवारी सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड़ यांच्या उपस्थितीत नगरसेवक आणि पाणी पुरवठा विभागाची बैठक येथील सभागृहात पार पडली. यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या ढीसाळ नियोजनावर नाराजी व्यक्त करून कुपवाडच्या नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी निर्णय घेण्यास सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने हीच बैठक पुन्हा सोमवारी घेण्याचा निर्णय घेतला.