प्रतिनिधी / कोल्हापूर
रंकाळ येथील पानबदकांचा मृत्यू बर्ड फ्लूने नव्हे तर कुरकुरे, चिप्स खाल्याने झाल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. के. पवार, यांनी सांगितले आहे. जनतेने कोणतीही भीती बाळगू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्यात बर्ड फ्ल्यु आजाराचा प्रार्दुभाव झाला असुन अनेक ठिकाणी कुक्कुट पक्षी, कावळे, बदके मृत्यूमुखी पडत आहेत. मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुणे व भोपाळ (मध्यप्रदेश) येथे पाठविण्यात येतात. कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी रंकाळा तलाव येथे दोन पानबदके व शहरात सरनाईक कॉलनी येथे एक कबुतर, गडहिंग्लज नगरपालिका क्षेत्रात दोन कावळे व मौजे तुर्केवाडी ता. चंदगड येथे एक कावळा मृत आढळुन आले होते.
त्याचे रोगनिदानाकरीता मृत पक्षी तपासणीसाठी पुणे येथील विभागीय रोग अन्वेषण विभाग, येथे पाठविण्यात आले होते. संबंधीत क्षेत्र हे सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येवून तपासणी व सर्वेक्षणाचे काम चालू करण्यात आले होते. सदर नमुने तपासणीचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून त्या पक्षांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यु मुळे झाला नसल्याचे अहवालात नमुद केले आहे. सदरचे वन्य पक्षी व कावळे, कबुतरांच्या मृत्युमुळे कुक्कुट पक्षीपालकांच्या मनात बर्ड फ्ल्युबाबत धास्ती निर्माण झाली होती. तरी सदर नमुन्याचे रोग निदान बर्ड फ्ल्यु नकारार्थी आल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. रंकाळा येथील 2 नर पानबदकांचा मृत्यू इतर कोणत्या कारणामुळे झाला असावा या बाबत प्रत्यक्ष शवविच्छेदन करणाऱया शास्त्रज्ञास विचारणा केली असता पानबदकांचा मृत्यू हा कुरकुरे, चिप्स खाल्यामुळे झाला असल्याचे कळवले आहे. असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.