प्रतिनिधी / कुरुंदवाड
कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत शनिवार रात्रीतून 2 फुटाने वाढ होऊन मजरेवाडी रस्ता बंद झाल्याने कुरुंदवाड शहराला बेटाचे स्वरूप आले आहे. कुरूंदवाड पोलीस ठाणे, बस डेपो, बाजार पेठ पाटील गल्ली, शिकलगार वाडा, झारी गल्लीत पाणी आल्याने राहिलेल्या नागरिकांची स्थलांतरासाठी धावपळ उडाली होती.
दरम्यान पंचगंगा नदीची पाणी पातळी 72 फूट तर कृष्णा नदीच्या पाणी पातळी 58 फूट इतकी झाली आहे.कोल्हापूर-कराड येथे पाणी पातळीत घट झाली आहे.स्थिर झाली आहे. पाणी वाढणार नाही अशी चर्चा होती. मात्र रात्रीतून शहरात पाणी शिरू लागल्याने नागरिक शहर सोडू लागले आहेत.
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने खिद्रापूर गावाला महापुराचा वेढा पडला आहे गावाला बेटा चे स्वरूप प्राप्त झाले असून कोपेश्वर मंदिरात चार फुटाने पाणी आले आहे.राजापुरवाडी गावची ग्रामपंचायत वगळता संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आहे.संपूर्ण गाव गुरुदत्त कारखान्यावर स्थलांतर करण्यात आले आहे.मजरेवाडी कुरुंदवाडच्या रस्त्यावर पाणी आल्याने कुरुंदवाड शहरातून बाहेर पडण्यासाठीचा एकमेव रस्ता खुला होता.तो रस्ताही आज रविवारी दुपारी पाण्याखाली गेल्याने शहराला महापुराचा वेढा पडला असून बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
शनिवारी मध्यरात्री सुमारास कुरुंदवाड पोलिस ठाण्यात पाणी शिरले आहे.दर्गा चौकात पाणी आले आहे.बारगीर मशिदी पासून पाटील गल्ली पर्यंत पाणी आले आहे. ढेपणपूर गल्लीतुन पाणी बाजारपेठेच्या दिशेने शिरू लागले आहे.मटन मार्केट परिसरात कारखाना मशिदी पर्यंत पाणी आले आहे.झारी गल्लीतून पाण्याचा प्रवास सुरू झाला असून भालचंद्र थेटरच्या दिशेने पाण्याच्या प्रवाहाला सुरुवात झाली आहे. शिकलगार वाड्यातून पाणी दिल्ली डवरी गल्ली परिसरातून शेळके गल्लीपर्यंत आले आहे तर बस डेपो देखील पाण्याखाली गेले आहे.
शहरातील ढेपनपूर परिसर व शिकलगार वाडा परिसरातील नागरिकांनी एस के पाटील व दत्त महाविद्यालयात स्थलांतर करण्यात आले आहे.तर त्यांची जनावरे महाराणा प्रताप चौकात स्थलांतर करण्यात आली आहेत.