कुरुंदवाड/प्रतिनिधी
कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी अचानक सार्वजानिक ठिकाणी धाडी टाकत आश्चर्याचा धक्का दिला. प्रजासत्ताक दिनानिमित्त दारूबंदी असताना काही मद्यपींनी कृष्णा घाट, महाराणा उद्यान, अहिल्याबाई होळकर उद्यान याठिकाणी काहींनी दरवाजा तोडून पेयजल याची नासधूस करून सरकारी मालमत्तेची हानी केल्याचे लक्षात येताच मुख्याधिकारी जाधव यांनी आपल्या पथकासोबत रात्रीच्या वेळेस अचानक धाडी टाकून खातरजमा केली.
यावेळी कुरुंदवाडच्या कृष्णा घाटावर दोन अज्ञान व्यक्ती आढळून आल्या असता त्यांची विचारपूस करण्यात आली. यावेळी या अज्ञातांनी आपण असेच बसलो असल्याचे सांगितले. यावेळी मुख्याधिकार्यांनी अशा ठिकाणी पुन्हा बसायचं नाही अशी समज देऊन त्यांना सोडून दिले. मात्र यापुढे सार्वजनिक ठिकाणी कोणीही मद्यपी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करून दंडात्मक वसुली करून नुकसान केलेल्या मालमत्तेची नुकसान भरपाई घेतली जाईल असे सांगितले. सरकारी मालमत्तेचे संरक्षण करणे हे जनतेचे काम असून त्यांना कुणीही पाठबळ देऊ नये असे आवाहन जाधव यांनी यावेळी केले.
काही जागृत मंडळे व सामाजिक कार्यकर्त्यांनी बागेचे, कृष्णा घाटाचे, विष्णू मंदिर, शिवतीर्थ, भालचंद्र थेटर इत्यादी ठिकाणचे हानी होऊ नये यासाठी जागृत राहून सहकार्य करावे यासाठी तरुणवर्गाने सहभाग घ्यावा स्वच्छ व सुंदर ऐतिहासिक वास्तू अबाधित ठेवावे असे आवाहनही केले.