ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या तावडीतून सोडवून आणण्यासाठी भारताने प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती ज्येष्ठ वकील हरीश सावळे यांनी दिली.
ते म्हणाले, भारताचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यामध्ये जातीने लक्ष घालत असून मध्यंतरी त्यांनी यासाठी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नसीर खान जंजूआ यांच्याशी चर्चा केली होती. त्यांच्या चर्चेत कुलभूषण जाधव यांना माणुसकीच्या आधारावर सोडावे असे सुचवले गेले. असं समजले आहे.
त्यामुळे या प्रयत्नांना सफलता मिळण्याची आम्हांला आशा आहे, असं सावळे यांनी सांगितले आहे. पुढे ते म्हणाले, पाकिस्तान माणुसकीच्या किंवा आणि कोणत्याही दृष्टिकोनातून त्यांची सुटका करत असेल तर ते आम्हांला हवे आहे. त्यामुळे भारत देखील पाकिस्तानला वारंवार हेच सांगत आहे. पण पाकिस्तानचा अहंकार मध्ये येत आहे. त्यामुळे त्यांनी सुटका याआधी झाली नाही असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, कुलभूषण जाधव यांच्यावरील सर्व आरोप भारताने फेटाळून लावले. त्यानंतर हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहचले. भारताने आपली बाजू मांडल्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. व त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वकील उपलब्ध करून द्यावा असे निर्देश पाकिस्तानला दिले आहेत.