पाकिस्तान सरकारने केले कायद्यात बदल
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरीक आणि भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना शिक्षेविरोधात अपील करण्याची संधी मिळणार आहे. पाकिस्तानने आपल्या कायद्यात यानुसार बदल केले आहेत. बदल करण्याचे विधेयक पाक संसदेने संमत केले. त्यामुळे शिक्षेविरोधात पाकच्या सर्वोच्च न्यायालयात त्यांना अपील करता येणार आहे.
जाधव यांना पाकिस्तानमध्ये हेरगिरी करण्याच्या बनावट आरोपावरून अटक करण्यात आली होती. त्यांचे पाकिस्तानने इराणमधून अपहरण केले होते. त्यांच्यावर घाईगडबडीने प्रकरण चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र त्यांच्यावर कारवाई करताना पाकिस्तानने सर्व आंतरराष्ट्रीय नियम धाब्यावर बसविले होते. त्यामुळे भारताने चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रकरण नेले होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. मात्र, अद्यापही जाधव यांच्यावर मृत्यूची टांगती तलवार कायम आहे.
पाकिस्तानच्या कायद्यानुसार हेरगिरीच्या आरोखाली शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांना अपील करण्याची संधी दिली गेली नव्हती. मात्र, आता कायद्यात बदल केल्याने त्यांना अपील करणे शक्य होणार आहे. अपील्नात त्यांच्या शिक्षेवर काय निर्णय होतो त्याकडे आता साऱयांचे लक्ष लागणार आहे.