मंत्री दीपक पाऊसकर यांचे आवाहन : शेतकऱयांना खतांचे वाटप
प्रतिनिधी / धारबांदोडा
शेतकरी हा देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱयांना आधार व शेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी खात्याने विविध योजना आखल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन वर्षातील दोन्ही हंगामात पिक घेण्याची तयारी शेतकऱयांनी ठेवली पाहिजे, असे आवाहन स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी केले.
किसानसभा वाकीकुळण, शिगाव या संघटनेशी संबंधीत शेतकरी व कुळे भागातील इतर शेतकऱयांना खतांचे वाटप करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री पाऊसकर यांनी स्वखर्चाने साधारण 90 शेतकऱयांना खतांचे पोत्या वितरीत केल्या. भरीपवाडा येथील महामाया मंदिरच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला कुळेचे सरपंच मनिष लांबोर, उपसरपंच खुशी वेळीप, पंचसदस्य निलेश सातपालकर, लक्सो डोईफोडे, निशा शिगावकर, आरुषी सावंत, किसान सभेचे अध्यक्ष नरेश शिगावकर, फार्मस क्लबचे अध्यक्ष तुळशीदास देसाई, प्रकाश देसाई आदी उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे सध्या राज्यात खतांचा तुटवडा आहे. कृषी खाते व गोवा बागायतदारच्या साहाय्याने हे खत उपलब्ध केल्याची माहिती त्यांनी दिली. वाकीकुळण येथील शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी लिफ्ट इरिगेशन प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र मुबलक पाण्याचा पुरवठा होत नसल्याने तेथे बंधारा बांधण्याचा प्रस्ताव शेतकरी संघटनेने मांडला होता. लवकरच या कामाला प्रारंभ होणार आहे. बंधाऱयामुळे पाण्याची समस्या दूर होईल. त्यामुळे शेतकऱयांनी वर्षांतील दोन्ही हंगामात पिक घेण्याचे आवाहन मंत्री पाऊसकर यांनी केले.
कुळे येथे अंदाजे दीड कोटी रुपये खर्चून 3 एमएलडी क्षमतेची पाण्याची टाकी, राक्षस मळीकेश्वर मंदिराजवळील पाणी प्रकल्प राज्य सरकार व केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेतंर्गत पूर्ण करण्यात येईल. येत्या चार ते पाच महिन्यात कुळे भागातील पाण्याचा प्रश्न निकाली लागेल असे मंत्री पाऊसकर यांनी सांगितले. कुळे पंचायतीच्या सतर्कतेमुळे या पंचायत क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वेळीच आटोक्यात आणणे शक्य झाले. यापुढेही नागरिकांनी अशाच प्रकारे खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कुळे पंचायत क्षेत्रातील शेतीच्या विकासासाठी मंत्री दीपक पाऊसकर यांचे लाभणारे सहकार्य शेतकऱयांचा उत्साह वाढविणारे आहे, असे सांगून पंचायतीकडूनही शेतकऱयांना नेहमीच सहकार्य देण्याचे आवाहन सरपंच मनिष लांबोर यांनी केले. स्वागतपर भाषणात नरेश शिगावकर म्हणाले, शेतकऱयांनी मंत्री पाऊसकर यांच्यापुढे आजवर ज्या ज्या मागण्यांचा प्रस्ताव ठेवला, त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यापुढेही शेतकऱयांना त्यांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता भासणार आहे. किसान सभा वाकीकुळणतर्फे मानपत्र देऊन मंत्री पाऊसकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. उमेश नाईक यांनी सूत्रसंचालन तर गोविंद शिगावकर यांनी आभार मानले.