मडगाव – केपे मुख्य रस्ताही पाण्याखाली गेल्याने वाहतूक चांदरमार्गे वळविली
वार्ताहर /केपे
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुशावती नदीलाही पूर आला असून पारोडा येथील पूल पाण्याखाली गेला आहे, तर मडगाव ते केपे या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने सर्व वाहतूक चांदरमार्गे वळवण्यात आली आहे. तसेच कुशावती नदीतून सुनील चव्हाण (वय 30) या व्यक्तीला अग्निशामक दलाकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीमुळे कुशावती नदीलाही पूर आला आहे व त्याचा फटका पारोडावासियांना बसला आहे. पारोडातील पूल पाण्याखाली जाण्याबरोबर आजुबाजूच्या परिसरात पाणी साचले असून शेती-बागायती व नदीच्या काठचा परिसर जलमय होऊन गेला आहे.
मुख्य रस्ता जलमय, वाहतूक वळविली
मडगाव ते केपे या मुख्य रस्त्यापर्यंत सकाळी 9.30 च्या दरम्यान पाणी पोहोचून रस्ताही जलमय झाल्याने वाहतुकीला धोकादायक बनला. त्यामुळे प्रशासनाने सर्व वाहतूक चांदरमार्गे वळवली. पुराचा फटका बसल्याने कुडचडे, सांगे, नेत्रावळी, केपे या परिसरांतील लोकांसाठी मडगावला ये-जा करणे बरेच त्रासदायक बनले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने व पाण्याची पातळी वाढतच असल्याने रात्री उशिरापर्यंत वाहने चांदरमार्गेच वळवण्यात आली.
नदीत अडकलेल्या व्यक्तीला काढले
कावरेपिर्ला, सुळकर्णा अशा विविध भागांतून येणारे पाणी कुशावती नदीत सामावत असते. केवणा, रिवणा, जांबावली येथून कुशावती नदी वाहत येऊन केपेतून पारोडा येथे पुढे जात असते. मात्र नदी दुथडी भरून वाहू लागल्याने कोणीही सध्या नदीकाठी जाणे ठाळत आहे. अशा वेळी केपे, भाट येथे कुशावती नदीत अडकलेली सुनील चव्हाण नामक व्यक्ती एका झाडाच्या फांदीला धरून मदतीसाटी हांक मारताना लोकांना दिसली. त्यानंतर त्याला अग्निशामक दलाचा जवान धर्मेंद्र नाईक याने पाण्यात उतरून बाहेर काढले. मात्र तो कुठून आला व पाण्यात कसा पडला हे अजून कळलेले नाही, असे पोलिसांनी सागितले. त्याला उपचारांकरिता पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
ठोस उपाययोजना नाही
वर्षातून तीन-चार वेळा तरी कुशावती नदीला पूर येऊन त्याचा फटका पारोडावासियांबरोबर आजुबाजूच्या परिसरांतील लोकांना व केपे-मडगाव मार्गावरील वाहतुकीला बसत असतो. मात्र अजूनपर्यंत यावर तोडगा काढण्यासाठी कोणतीच ठोस पावले उचललेली दिसत नाहीत. केपे व कुंकळ्ळी अशा दोन मतदारसंघांत समावेश असलेला हा परिसर असून कोणत्याच लोकप्रतिनिधीने या समस्येकडे गंभीरपणे लक्ष दिलेले नाही. काही वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी येथे पाहणी केली होती व अधिकाऱयांना उपाययोजना आखण्यास सांगितले होते. मात्र ते कागदी घोडेच बनून राहिल्याने लोकांच्या पदरी पुन्हा निराशा आली.