कोल्हापूर / संजीव खाडे
1982 ची राष्ट्रकुल अर्थात कॉमनवेल्थ स्पर्धा. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये स्पर्धेला प्रारंभ झाला. भारतीय पथकही या स्पर्धेत जोमाने उतरले होते. पण स्पर्धा सुरू होऊन तीन चार दिवस झाले तरी भारताच्या पदाची पाटी कोरीच होती. इतर देश पदक मिळवित असताना भारतीय गोटात चिंतेचे वातावरण होते. अखेर चिंतेची कोंडी फोडली ती कोल्हापूरच्या राम सारंग यांनी. 48 किलो वजन गटात चारही कुस्त्या जिंकत सारंग यांनी भारताच्या पदकाचे खाते सुवर्णपदकाने उघडले. राम भारताला पावला.
या घटनेला चाळीस वर्षे अर्थात चार दशके लोटली. त्यानंतर राम सारंग यांचे कुस्तीतील कार्य प्रामाणिकपणे गुरूच्या भूमिकेत सुरू आहे. पण भारताला एकेकाळी पावणाऱया या रामाची केंद्र सरकारने आजवर उपेक्षा केली आहे. अर्जुन किंवा ध्यानचंद पुरस्कार हा सारंग यांचा हक्क असताना त्यांना आजवर डावलण्यात आले आहे. महाराष्ट्रातील खासदार असोत वा केंद्रात असणारे मराठी मंत्री असतो, त्यांनी राम सारंग यांच्यावर आज झालेला अन्याय दूर करून त्यांना ध्यानचंद पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी कुस्ती जगतातून होत आहे.
कोल्हापूर जिल्हय़ातील मुरगूड (ता. कागल) छोटय़ा गावात गरीब घरात जन्मलेल्या राम सारंग यांनी अपार कष्ट, मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर कुस्तीत स्थान निर्माण केले. 48 वजन गटात त्यांनी ऐशी, नव्वदच्या दशकात भारतीय कुस्तीत दबदबा निर्माण केला होता. 1982 च्या राष्ट्रकुल आणि आशयाई स्पर्धेआधी त्यांनी ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. तयारीसाठी रशियातील मास्कोत झालेल्या शिबिरातही भाग घेतला होता. राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक मिळविल्यानंतर सारंग यांनी इराण, आफ्रिका, याकुतिया, उज्बेकिस्तान येथील स्पर्धेत भारतीय संघाचे मार्गदर्शन म्हणूनही योगदान दिले. पैलवानकीतून निवृत्त झाल्यानंतर सारंग यांनी कुस्तीशी असणारे आपले नाते कायम ठेवले. वस्ताद, प्रशिक्षकाची भूमिका पार पाडताना त्यांनी क्रीडा प्रबोधिनीत पंधरा वर्षे प्रशिक्षणाचे काम केले. राज्यातील अनेक कुस्ती स्पर्धेत पंच, मार्गदर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, महाराष्ट्र केसरी, रूस्तम ए हिंद अमोल बुचडे, अस्लम काझी, आंतरराष्ट्रीय महिला मल्ल रेश्मा माने, कोमल गोळे, आंतरराष्ट्रीय मल्ल संदीप सावंत, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, नंदकुमार आबदार, सचिन येलबर, कर्नाटक केसरी, कंटेरवा केसरी संजय माने, तेलंगणा केसरी जाफर बीन मुबारक, विष्णू खोसे यांच्यासह असंख्य दिग्गज मल्ल तयार केले. आपल्या कामावर सारंग खूष आहेत. त्यांनी कळंबा येथे आपली स्वतःची अशी राष्ट्रकुल कुस्ती संकुल नामक ऍकॅडमी सुरू केली आहे. तेथे 125 मल्ल आहेत. सारंग सरांचे कुस्तीच्या विकासाचे काम सुरू आहे.
एकच खंत, केंद्राकडून दुर्लक्षाची
राम सारंग यांच्या कुस्तीतील प्रवासात त्यांना प्रारंभी कागलच्या छत्रपती शाहू साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. विक्रमसिंह घाटगे यांचे प्रोत्साहन, मदत लाभली. राजेंच्या मुळेच मी भरारी घेऊ शकलो, अशी भावना राम सारंग सर मांडतात. मात्र त्यांना एकच खंत आहे ती कुस्तीत खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून प्रामाणिकपणे सेवा करूनही केंद्र सरकारने केलेल्या दुर्लक्षाबद्दल. ज्यावेळी सारंग यांनी राष्ट्रकुलमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. तेंव्हा खेळाडूना बक्षिसे, पैसे मिळत नव्हते. मानसन्मानही मर्यादित होता. त्याबद्दलही सारंग सरांची तक्रार नाही. त्यांना एवढेच वाटते की, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले जाते. पण आजवर केवळ दिल्लीच्या कुस्तीतील उत्तर भारतीय लॉबीमुळे सारंग यांच्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. वास्तविक अर्जुन पुरस्कारावर हक्क असताना तो आजवर डावलला गेला. त्यानंतर नियमात बदल झाल्याने आता ध्यानचंद पुरस्कार दिला जातो. पण तो देखील गेली वीस वर्षे अर्ज करूनही दिला गेलेला नाही. आज राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने सारंग यांच्याशी संवाद साधत असताना त्यांनी मांडलेल्या भावना वाचकांपर्यत, क्रीडाप्रेमींपर्यंत पोहचविताना राजकीय नेत्यांनी, खासदारांनी आणि केंद्र सरकारने रामाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा आहे.
हक्कदार हक्कापासून वंचित
राष्ट्रकुलात राम सारंग यांच्याबरोबर असलेल्या लिलाराम नामक उत्तर भारतीय मल्लाला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांना अर्जुन, हिंदकेसरी (कै.) मारूती माने, रूस्तम ए हिंद (कै.) दादू चौगले आणि रूस्तम ए हिंद (कै.) हरिश्चंद्र बिराजदार यांना ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मात्र हक्कदार असूनही राम सारंग यांना अर्जुन पुरस्कार किंवा ध्यानचंद पुरस्कार लाभलेला नाही, ही दुर्दैवी बाब आहे. रामाचा वनवास पेंव्हा संपणार हा प्रश्न आहे.