`भारतीय कुस्ती : इतिहास आणि परंपरा’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्यानिमित्ताने लेखक शंकर पुजारी यांनी व्यक्त केली भावना
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन
संग्राम काटकर / कोल्हापूर
कुस्तीतील चालतं-बोलतं विद्यापीठ म्हणून महाराष्ट्रात नावारुपाला आलेले कोथळी (ता. शिरोळ) ज्येष्ठ कुस्ती समालोचक पै. शंकरराव पुजारी (कोथळीकर) लिखित `भारतीय कुस्ती : इतिहास आणि परंपरा’ या पुस्तकाचे बुधवारी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन झाले. पुस्तक प्रकाशनच्यानिमित्ताने पुजारी यांनी कुस्तीवरील अतुट प्रेम व्यक्त करत मनातील भावविश्वाचा तरुण भारतशी बोलताना उलघडा केला. माझा कुस्ती हाच ध्यास आणि कुस्ती हाच श्वास असल्याची भावून भावनाही त्यांनी व्यक्त केली.
आज सगळा जमाना झटपट बदलत आहे. कुस्तीही कमालीची बदलली आहे. त्यामुळे जुन्यांबरोबरच नव्या मल्लांना मेहनतीसह कुस्तीच्या पद्धतीतील बदल स्वीकारावे लागणार आहे. शासनाकडून कुस्तीला प्रोत्साहन मिळाले तर मल्लांना कुस्तीत करीअर करता येईल, अशी नवी व्यवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे कुस्तीतील काही अघटीक घटनांना डोळ्यासमोर ठेवून आज सगळं काही अंधकारमय झालं आहे, असे मल्लांनी समजण्याचे काही कारणच नाही. आजही महाराष्ट्रासह देशात कुस्तीसाठी चांगले काम करणारे अनेकजण आहेत. शिवाय जुन्या काळात महाबली नाव कमवलेले सत्पाल यांच्यापासून ते कुस्तीसम्राट युवराज पाटील आणि सादीक पंजाबीपासून ते पोलीस अधिकारी झालेले राहूल आवारे, नरसिंग यादव आणि विजय चौधरी यांच्या पर्यंतच्या अनेक मल्लांनी कुस्तीत नाव कमवून संपुर्ण भारतात चाहते निर्माण केले. मी स्वतः वर्षातील 365 दिवसांपैकी सुमारे अडीचशे दिवस राज्यातील कुठल्या ना कुठल्या तरी मैदानावर जाऊन कुस्तीचे समालोचन करत असतो. त्यातून कुस्तीचा इतिहास कुस्तीप्रेमींसमोर मांडत असतो. हा सारा स्फुर्तीदायी इतिहास लोकांपर्यंत शब्दरुपाने पोहोचवण्यासाठी पुस्तक लिहिण्याचा विचार मनात घोंघावत होता. मात्र कुस्ती मैदानातील समालोचन करणं, आखाडÎांत जाऊन मल्लांना कोचिंग करणं आणि वाढत्या वयामुळं राज्यभर पायपीट करुन मल्ल, आखाडÎांच्या माहितीसह महाराष्ट्रासह देशात गाजलेल्या मल्लांचे फोटो संकलित करण्यासाठी करावी लागणारी धगधग यातून पुस्तक लिहिण जमेल की नाही, असा प्रश्न मनात आला होता. पण नव्याने कुस्ती क्षेत्रात येणाऱया शहरासह ग्रामिण भागातील हजारो मुलांना डोळ्यासमोर भारतीय कुस्तीचा परामर्श, जुन्या काळातील तगडे मल्ल, लालमाती आणि मॅटवरील कुस्ती, कुस्तीतील डाव, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, नामवंत मल्लांच्या गाजलेल्या लढती, कुस्ती शौकिनांनी विविध क्षेत्रात मासलेली मुसंडी, कुस्ती-मर्दानी खेळ, कुस्तीची प्रेरणा, पैलवानाचा आहार, मल्लांच्या आठवणी अशी सगळी माहिती जमवून मल्लांच्या छायाचित्रांसह लेखन करण्याचा निर्धार केला. त्यानुसार शेतीप्रगती संपादक रावसाहेब पुजारी यांना सोबत घेऊन पुस्तक लिहिण्याला सुरुवात केली.
माहिती व फोटो संकलित करुन भारतीय कुस्ती ः इतिहास आणि परंपरा या शिर्षकाखाली पुस्तक जन्माला घातले. तब्बल 30 प्रकरणे 204 पानांमध्ये शब्दबद्ध केली. पुस्तक लिहिताना बुद्धिमान आणि चपळ त्याचे नाव पैलवान, आत्मबल, मनोबल आणि शक्तीबलाने पैलवान तयार होतो, मन, मनगट आणि मेंदूच्या विकासावर पैलवान घडतो आणि घडलेला पैलवान मर्दानी कुस्ती करतो, हा गाभा मी सोडलेला नाही. तसेच मल्ल, त्यांच्या कुस्ती आणि मल्लांची जडणघडणीवर प्रकाशझोत टाकून मल्ल हा आपल्याला नेहमीच आपला का वाटतो हे वाटत असतो हेही पटवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
म्हणून मल्ल आणि समालोचक झालो : शंकर पुजारी
वडील (कै.) बापू पुजारी यांच्या इच्छेनुसार मी मल्ल झालो. त्यांनी मला कोथळीतील मंगेश्वर तालमीत मेहनतीसाठी पाठवले. शाळा शिकत मी मल्लविद्येचेही धडे घेऊन लागलो. सातवीपर्यंत वर्गातही पहिला क्रमांक मिळवत होतो. मात्र वडीलांना मी मोठा मल्ल व्हावे, असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी माझी शाळा सातवीच थांबवून मला फुलटाईम मल्ल केले. मी जसा मोठा होऊ लागलो, तशा अनेक चटकदार कुस्ती करु लागलो. पैलवान विष्णू सावर्डेकर यांच्याशी कुस्ती करण्याचे मला भाग्य लाभलं. एकेदिवशी सांगलीत झालेल्या कुस्ती मैदानात मला पैलवान संभाजी पवार यांनी स्टेजवर बोलावून समालोचन करण्यास सांगितलं. कुस्तीवरील वाचनामुळे मी माझ्या नैसर्गिक करारी आवाजात चांगल्या प्रकारे सामलोचन करु शकलो. याचवेळी माझ्यातील समालोचकही जागा झाला होता. राज्यभर जशी मैदाने होऊ लागली, तसे मला समालोचनासाठी निमंत्रणे येऊ लागली. त्यामुळेच गेल्या 32 वर्षात तब्बल 5 हजारांवर कुस्ती मैदानात समालोचन करुन मुकी कुस्ती व मल्लांचे डाव बोलके केले याचे मला समाधान वाटते.