नागरिकांना भेडसावतेय पाणीटंचाई : कोनवाळ गल्लीतील कूपनलिकेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहर व उपनगरातील बहुतांश कूपनलिका खराब झाल्या असून विद्युतपंप नादुरुस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सातत्याने तक्रारी करूनही दुरुस्ती करण्यात आली नाही. कोनवाळ गल्ली परिसरातील कूपनलिकेच्या दुरुस्तीसाठी तक्रार देऊन महिना होत आला तरी दुरुस्ती करण्यात आली नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील पाणीपुरवठा नियोजनाची जबाबदारी एलऍण्डटी कंपनीकडे सोपविण्यापूर्वी कूपनलिकांची दुरुस्ती केली नाही. दुरुस्ती करण्याकडे पाणीपुरवठा मंडळाने कानाडोळा केला होता. त्यामुळे शहरातील असंख्य कूपनलिका सध्या बंद अवस्थेत आहेत. काही कूपनलिकांचे विद्युतपंप खराब झाले असून काही कूपनलिकांचे स्टार्टर नादुरुस्त आहेत. तर याकडे एलऍण्डटी कंपनीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरातील असंख्य कूपनलिका बंद असून नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण होत आहे. शहरात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. तसेच दैनंदिन वापरासाठी कूपनलिका आणि विहिरींचा पाणीपुरवठा करण्यात येतो. पण कूपनलिका नादुरुस्त असल्याने दैनंदिन वापरासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
शहर व उपनगरातील कूपनलिकांची दुरुस्ती करावी, अशी मागणी एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांकडे करण्यात आली होती. याबाबत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. कोनवाळ गल्ली परिसरातील कूपनलिकेच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी एलऍण्डटी कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन दुरुस्तीची मागणी केली होती. पण महिना होत आला तरी दुरुस्ती झाली नाही. तर कूपनलिकेचा विद्युतपंप दुरुस्तीसाठी नेण्यात आला आहे. त्यामुळे विद्युतवाहिनी काढून बाजूला ठेवण्यात आली होती. सदर विद्युतवाहिनीची चोरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. कूपनलिका बंद असल्यामुळे नागरिकांना पाणी समस्या भेडसावत आहे. एलऍण्डटी कंपनीच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत असून कूपनलिकांची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.