आजपासून पुन्हा ‘रात्र दशावताराची’ : तब्बल आठ महिने रसिकांना राहिली प्रतीक्षा
मयुर चराटकर / बांदा:
‘या दरबारात पाऊल पडताक्षणी मन कसे कृतकृतार्थ झाले, म्हणतात ते काही खोटे नाही. देवाचे दिव्यत्व, धर्माची धार्मिकता आणि माणसाचे माणूसपण या त्रिवेणी संगमातून माणुसकीचा जन्म झाला. ती माणुसकी आपल्या जीवनात सतेज ठेवणे प्रत्येक माणसाचे आद्य कर्तव्य आहे..’ गावागावात रंगणाऱया दशावतारी नाटकामधून हे कानी पडणारे बोल गेले आठ महिने कोरोनामुळे लुप्त झाले होते. आजपासून दशावतार राजाचे हे बोल पुन्हा एकदा गावागावात घुमणार आहेत. पुन्हा एकदा तडाखेबाज संवाद, अभिनयाची जुगलबंदी, संगीताची मेजवानी व द्वंद्व युद्धाचा थरार रसिकांना अनुभवता येणार आहे. कोरोनामुळे गेले आठ महिने बंद असलेला दशावतार सादर करण्यास महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे.
‘नवल गुरू रायाची, धन्य आरती..’ नाटकाची तयारी पूर्ण झाल्यावर सर्व कलाकार संगीत साथीने भारदस्त आवाजात नटराजाच्या नमनासाठी दत्तगुरुची आरती म्हणतात. या आरतीने वातावरण दशावतारमय होऊन जाते. गावागावात रंगणाऱया दशावतार नाटकाचे हे चित्र गेले आठ महिने कोरोनाच्या विळख्याने स्तब्ध झाले होते. आता शासनाने दशावतार सुरू करण्यास परवानगी दिल्याने पुन्हा एकदा दशावतार नाटकाची पर्वणी रसिकांना मिळणार आहे.
नवनिर्मितीची रसिकांना उत्सुकता
कोरोनामुळे संपूर्ण जग थांबले. यामध्ये दशावतार कलाकारांनाही फटका बसला. अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली. या कलेवर जीवापाड प्रेम करणारा रसिकही निराश झाला होता. शासनाने परवानगी दिल्याने कलाकारांसमवेत रसिकही उल्हसित झाले आहेत. सक्तीच्या विश्रांतीचा फायदा घेऊन नवी कथानके, नव्या संकल्पनांतून दशावतार नाटके सादर होतील, अशी रसिकांना अपेक्षा आहे.
नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई
दशावतार नाटक सादरीकरणासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार वैभव नाईक व नीतेश राणे यांनी शासनाकडे केली होती. दशावतार संघटनांनीही शासन व लोकप्रतिनिधींकडे मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने परवानगी दिली आहे. मोकळय़ा जागेत होणाऱया कार्यक्रमांना परवानगी दिली गेली आहे. कोरोनाबाबत आवश्यक ती काळजी घेऊन, नियमांचे पालन करून दशावतार सादर करायचे आहे. त्यासाठी आवश्यक नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही यात नमूद आहे.
आमदार नाईक, राणेंचे प्रयत्न
कोरोनाच्या काळात दशावतार नाटके बंद झाल्याने ती पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे यांनी केली होती. अलीकडेच राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे याबाबत भेट घेत आमदार नाईक व शिवसेना नेते संदेश पारकर, लोककला अकादमी सिंधुदुर्गचे अध्यक्ष दिनेश गोरे यांनी दशावतार नाटकांना परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. सिंधुदुर्ग दशावतार चालक-मालक संघटना, दशावतार प्रेमी व दशावतार संबंधित विविध संघटनांनीही लोकप्रतिनिधी व शासनाकडे या बाबत मागणी केली होती. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार नीतेश राणे, आमदार वैभव नाईक यांच्याकडे दशावतार मंडळांनी मागणी केली होती. सर्वांच्या प्रयत्नांनी हा प्रश्न मार्गी लागला आहे.
नियमांच्या अधीन राहून कला सादर करू – संतोष मेस्त्राr
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना इन्सुली दशावतार मंडळाचे कलाकार संतोष मेस्त्राr म्हणाले, कोरोनाची महामारी सुरू असतानाही शासनाच्यावतीने आम्हा दशावतार कलाकारांना कला सादर करायची परवानगी देऊन आमच्या उपजीविकेचे साधन सुरू केल्याचा आम्हाला आनंद होत आहे. यासाठी प्रयत्न करणारे आमच्या जिल्हय़ातील आमदार, खासदार व प्रसारमाध्यमे यांचे आभार व्यक्त करतो. तसेच शासनाच्या नियमांच्याआधीन राहूनच आम्ही कला सादर करू, असे ते म्हणाले.
कला पुन्हा बहरेल – दिनेश गोरे
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना लोककला अकादमी सिंधुदुर्गचे अध्यक्ष दिनेश गोरे म्हणाले, गेले आठ महिने कोरोनामुळे दशावतार नाटके बंद आहेत. दशावतार सुरू करण्यासाठी अनेकांनी अथक प्रयत्न केले. अलीकडेच आमदार नाईक यांनी आमच्या संघटनेची सांस्कृतिक मंत्री देशमुख यांच्यासमवेत भेट घडवून आणली. त्यांनी दशावतार सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासानची तात्काळ पूर्तताही केली. या निर्णयामुळे कलांकाराबरोबर रसिकांनाही आनंद झाला असून दशावतार कलेला मिळालेल्या सक्तीच्या ‘ब्रेक’नंतर कलेला नव्याने बहर येईल, असे ते म्हणाले.
अशी आहे नियमावली
शासनाने अटींसह दशावतार नाटके सुरू करण्यास परवानगी दिली आहे. प्रेक्षकागृहात तंबाखूजन्य पदार्थांना मनाई करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सचे पालन, मास्क वापरणे, थर्मल गम, सॅनिटायझरचा वापर करून, तपासणी करूनच प्रेक्षकांना प्रवेश देण्यात यावा. बसण्याकरिता किंवा उभे राहण्याकरिता खुणा करण्यात याव्यात. कार्यक्रम ठिकाणी हॉटेल लावता नये. कोरोनाबाबतच्या काळजीबाबत ध्वनिफितीवर सांगावे तसेच फलक लावणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.