‘शेतकऱयांनो, यांच्या नादाला लागू नका, विरोधक खोटे बोलताहेत’ : मोदींचा हल्लाबोल
वृत्तसंस्था / पाटणा, नवी दिल्ली
लोकसभेत शेतकऱयांशी संबंधित विधेयक संमत झाले आहे, ज्यामुळे शेतकऱयांना बंधनातून मुक्ती मिळेल. आता शेतकऱयांची मध्यस्थांच्या कचाटय़ातून सुटका झाली आहे. वर्षानुवर्षे देशावर राज्य केलेले लोक या विधेयकाला विरोध करत आहेत आणि शेतकऱयांशी खोटे बोलत आहेत. ज्या लोकांनी सत्ता चालवली आणि त्याला आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट केले, आता त्याच गोष्टीवर राजकारण करत आहेत, असा हल्लाबोल चढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विरोधकांना फटकारले. बिहारमधील रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते.
कृषी विधेयकांवरुन राजकीय वातावरण तापले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांना आपली दिशाभूल होऊ देऊ नका असे आवाहन केले आहे. रेल्वे पुलाचे लोकार्पण केल्यानंतर बिहारमधील रॅलीला संबोधित करताना नरेंद्र मोदी बोलत होते. शेतकऱयांना योग्य किमान आधारभूत किंमत मिळणार नाही अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे. पण त्यांना देशातील शेतकरी किती जागरुक आहे याची कल्पना नाही, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात कृषी विधेयकांवर बोलताना होणाऱया आरोपांना उत्तरे दिली. तसेच काँग्रेससह विरोधकांवर टीका केली. सरकारी संस्था गहू, तांदूळ इत्यादी शेतकऱयांकडून खरेदी करणार नाहीत, अशी खोटी माहिती पसरवली जात आहे. हे साफ खोटे आणि चुकीचे आहे. हा शेतकऱयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदींनी विधेयकांबद्दल शेतकऱयाचे अभिनंदन करताना शेतकऱयांसाठी हे सुरक्षा कवच असल्याचे म्हटले आहे. देशातील काही लोक जे अनेक दशके सत्तेत होते, देशावर राज्य केलें ते लोक शेतकऱयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱयांशी खोटे बोलत आहेत. निवडणुकीदरम्यान शेतकऱयांची मते मिळवण्यासाठी मोठय़ा मोठय़ा गोष्टी बोलत होते. आपल्या जाहीरनाम्यातही सांगत होते. पण निवडणुकीनंतर विसरुन जात होते, अशी अप्रत्यक्ष टीका नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली.
केंद्राच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱयांच्या खात्यात एक लाख कोटी रुपये जमा केले गेले आहेत. बऱयाच योजना पूर्ण केल्या गेल्या, सिंचनासाठी स्वतंत्र योजना आखली जात आहे. पंतप्रधान मोदींनी शेतकऱयांना आवाहन करत सांगितले की, त्यांच्यात अडकू नका आणि सावध राहा. ते शेतकऱयांच्या बचावासाठी बोलत आहेत, परंतु ते मध्यस्थांना पाठिंबा देत आहेत, असा आरोपही मोदींनी केला.
लालू यादव यांच्यावर टीका
पंतप्रधान मोदींनी येथे आपल्या भाषणात लालूप्रसाद यादव यांच्यावर टीका करण्याची संधीही सोडली नाही. अटलजींचे सरकार गेल्यानंतर या प्रकल्पाची गती कमी झाली. जर दुसऱया सरकारला बिहारच्या लोकांची काळजी असती आणि जे लोक त्यावेळी तत्कालीन रेल्वेमंत्री होते त्यांना जर काळजी असती तर हे काम यापूर्वीच झाले असते. पण त्यांना असे करण्याची इच्छा नव्हती, असा टोमणा त्यांनी लालूंना उद्देशून मारला. तसेच दृढनिश्चय असेल आणि नितीश यांच्यासारखा साथीदार असेल तर सर्व काही शक्मय आहे, असे म्हणत नितीशकुमारांचे कौतुक केले.
लिच्छवीसह दोन गाडय़ांना ग्रीन सिग्नल
याप्रसंगी मोदींनी समस्तीपूर रेल्वे विभागाच्या अनेक योजनांचे उद्घाटन केले आणि सुपौल येथून आसनपूर कुपहा डेमू टेनचे कामकाजही मंजूर केले. मोदींनी समस्तीपूर रेल्वे विभागाच्या 5 मोठय़ा योजनांसह 3 गाडय़ांनाही ग्रीन सिग्नल देत रवाना केले. डीआरएम अशोक माहेश्वरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी सीतामढी ते आनंद विहार टर्मिनलसाठी इलेक्ट्रिक इंजिन असलेली लिच्छवी एक्स्प्रेस, सुपौल सरायगढ आसनपूर कुपहा स्टेशनसाठी डेमू आणि सरायगढ राघोपूरसाठी एका डेमू टेनला डिजिटल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रीन सिग्नल देऊन रवाना केले.