ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने सुरू आहेत. आंदोलक शेतकऱ्यांनी केंद्राचा वाटाघाटीचा प्रस्तावही फेटाळून लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी कायद्यातील सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत, असे मोदींनी म्हटले आहे.
‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी म्हणाले, भारत शेती आणि शेतीशी संबंधित गोष्टींमध्ये नवा आयाम जोडत आहे. कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी नवे मार्ग खुले झाले आहेत. नव्या संधी निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीही दूर होऊ लागल्या आहेत. मोदींनी यावेळी महाराष्ट्रातील जितेंद्र भोइजी या शेतकऱ्याचा उल्लेख केला. जितेंद्र यांनी नव्या कायद्याचा फायदा उचलत आपली थकबाकी वसूल केल्याचे मोदींनी सांगितले.
नव्या कायद्याअंतर्गत संबंधित क्षेत्रातील एसडीएमला केवळ एका महिन्यात शेतकऱ्याच्या तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक आहे. तरी देखील उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, केरळमधील शेतकरी तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
अन्नपूर्णा देवीची 100 वर्षांपूर्वीची मूर्ती परत आणणार
अन्नपूर्णा देवीची 100 वर्षांपूर्वीची मूर्ती कॅनडामधून परत आणण्यात येत आहे. 1913 मध्ये ही मूर्ती वाराणसीतील एका मंदिरातून चोरून देशाबाहेर नेण्यात आली होती. ही मूर्ती पुन्हा देशात येत असल्याने ही देशवासियांसाठी गर्वाची बाब आहे.