राहुल गांधींची स्पष्टोक्ती – संसद परिसरात निदर्शने
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कृषी कायद्याविरोधात शेतकऱयांचे आंदोलन आणि दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर काँग्रेस नेते शुक्रवारी प्रथमच माध्यमांसमोर आले. यावेळी नवे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत त्यांनी आपण शेतकऱयांच्या पाठीशी असल्याची स्पष्टोक्ती दिली. मोदी सरकार दोन वर्षे कृषी कायद्याला स्थगिती देणार होते, ती स्थगिती त्यांनी कायमची द्यावी आणि त्यासाठी आम्ही मदत करु असे काँग्रेस नेता राहुल गांधी म्हणाले. कृषी कायद्यांमधील सुधारणांबाबत शेतकऱयांशी चर्चा करा असे आवाहनही त्यांनी केले. ते दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राहुल गांधींनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर सडकून टीका केली. शेतकऱयांवर लाठीमार करुन पंतप्रधान देशाला दुबळे बनवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. मोदी सरकार शेतकऱयांशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर लाठीमार करतेय. शेतकऱयांनी एक इंचही मागे हटू नये, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनावाच्या सुरुवातीलाच कृषी कायद्याविरोधात काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या खासदारांनी संसद परिसरातील महात्मा गांधी पुतळय़ासमोर घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी केली आहे. ‘राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांचा अपमान करत आहोत.’ असे काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले. ‘नवीन कृषी कायदे रद्द करावे, या शेतकऱयांच्या मागण्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचे हेच प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
‘कृषी कायदे मागे घ्यायला हवेत. आम्ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणास विरोध करीत असून शेतकऱयांच्या समर्थनार्थ निदर्शने करत आहोत. आम्हाला सेंट्रल हॉलमध्ये येण्याची परवानगी नव्हती, म्हणून आम्ही गेटवरच निदर्शने करत आहोत. शेतकऱयांना देशद्रोही म्हटले जात असल्याने आम्ही या अभिभाषणास विरोध करीत आहोत, असे स्पष्टीकरण आम आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी दिले आहे.