माजी मंत्री महादेव जानकर यांची स्पष्टोक्ती
प्रतिनिधी/ सातारा
पंतप्रंधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांच्या हिताचे बील आणले आहे. शेतकरी ते ग्राहक असे विधेयक आणले आहे. त्यामुळे शेतकरी आता मुंबईच्या विधानभवनातही जावून भाजी विकू शकतो. मात्र, राजकीय विरोधासाठी विरोध करु नये, पवारसाहेबांच्या पुस्तकात काय लिहिले आहे, काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्या पुस्तकात काय लिहिले आहे, अशा शब्दात जळजळीतपणे कृषी कायद्याला विरोध करणाऱयांना रासपचे संस्थापक माजी मंत्री महादेव जानकर यांनी प्रतिउत्तर देत रासप कृषी कायद्याच्या पाठीशी आहे, असे सांगितले. दरम्यान, आगामी काळात रासप काँग्रेसच्या तोडीचा पक्ष होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. साताऱयात रासपच्या मेळाव्यापुर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी जानकर म्हणाले, दोन राज्यात जर रासपला मान्यता मिळाली तर रासप नॅशनल पार्टी बनेल. काँग्रेस, बीजेपीच्या लाईनमध्ये आमचा पक्ष येईल. हा प्रयत्न चाललेला आहे. दुदैवाने सातारा जिह्यात वाढे येथे माझा जन्म झाला. त्या वाढय़ाच्या जिह्यात आमचा काही विजय नाही म्हणून कार्यकर्त्यांना काय चुकीचे काय बरोबर हे सांगायला आलो आहे. आपला पक्ष वाढावा म्हणून आलो आहे. भाजप मोठा आहे, राष्ट्रवादी मोठा आहे. या जिह्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य मोठे आहे, शिवसेना आहे. परंतु आता आम्ही काँग्रेसची जागा घेवू शकतो, अशी तयारी केलेली आहे. जेथे निवडून येवू तेथेच तयारी करा, अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळेला खासदार निवडून आणायचे आहेत त्यावेळेला ग्रामपंचायती आणल्या पाहिजेत, आपण पाच वर्षे मागे आहोत. येणाऱया पंचायत समिती, जिल्हा परिषदेत रासप आपले उमेदवार उभे करुन खाते खोलले जाणार आहे. काशिनाथ शेळके असतील, खंडेराव सरक असतील, भाऊसाहेब वाघ असतील, अशी मंडळी उभी राहतील.
पक्ष उभारणीसाठी निधी गोळा करण्याचे काम सुरु आहे. एक कोटी गोळा करणार आहोत, असे सांगत कार्यकर्त्यांनी कार्याच्या माध्यमातून आजही जिह्यात मला जीवंत ठेवले, असे सांगत सातारा जिह्यात टाईमपास करायला यायची वेळ आली असल्याचे सांगितले. फलटण, माणमध्ये विधानसभेची तयारी आहे. जिकडे मी असेल तिकडे विजय निश्चित आहे. तेवढी ताकद आहे. चार पाच वेळा बैठका घेतल्या तर वातावरण चांगले होईल. मी उत्तर भारत, कर्नाटक, गुजरात येथे रासपचे कार्य वाढवले आहे. पुढच्या पाच दहा वर्षात उत्तर प्रदेशात 20 आमदार रासपचे येतील. गुजरातमध्ये पाच ते सहा आमदार, कर्नाटकात 15 आमदार करायची तयारी ठेवली आहे. महाराष्ट्रात 15 आज जे पवारसाहेब महाराष्ट्रात आहे तशी आमच्याकडे जागा येईल. आता आम्ही एनडीएत आहोत. महाविकास आघाडीवर सगळे नाराज आहेत. कोरोनाच्या काळात सगळेच परेशान आहेत. मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा आणि वीज बील माफ करावे, असेही त्यांनी सांगितले.
कृषी कायद्याबाबत बोलताना ते म्हणाले, आजपर्यंत युपीएच सरकार होते. महाराष्ट्रात 1 लाख 12 हजार शेतकऱयांच्या आत्महत्या झाल्या. काय केले त्या सरकारने. आता मोदींजीचे कौतुकच आम्ही करतो. उगच राजकारण म्हणून विरोध कायद्याला करु नये. भाजपा हा काय माझा पक्ष नाही. परंतु त्या कायद्याचा अभ्यास केला आहे. मुंबईंच्या विधानभवनात भाजी विकायला शेतकऱयांना परवानगी दिली. एजंटगिरी बंद केली. शेतकऱयांच्या आंदोलनकर्त्यांसोबत अठरा मिटिंग झाल्या. परंतु त्यांचा विरोध हा विरोधासाठीच आहे. केंद्रीय कृषी मंत्री तोमर हा शेतकऱयाचा मुलगा आहे. युपीएचाही अभ्यास करा आणि एनडीएचाही. हा कायदा गरीब शेतकऱयांच्या फायद्याचा आहे, असे त्यांनी सांगितले.