- मुंबई, पुणे, नाशिक बहुतांशी बजारसमित्या बंद
ऑनलाईन टीम / पुणे :
नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. या बंदला काँग्रेससह 20 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. पुणे, नाशिक, मुंबई विविध शहरात या बंदचे समर्थन करण्यात आले आहे.
- पुण्यात केवळ 174 गाड्यांची आवाक
शेतकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि भारत बंदत सहभाग घेतल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येत आहे. पुण्यात फळे आणि भाजीपाला घेऊन येणाऱ्या फक्त 174 गाड्यांची आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झाली आहे.
एरवी दररोज किमान 900 मालवाहतूक गाड्यांमधून या बाजार समितीत फळे आणि भाजीपाल्याची आवक होत असते. त्यामुळे बाजार समितीत आज गर्दी दिसून येत नाहीये. बाजार समितीतील किराणा आणि भुसार मालाची बाजारपेठ शेतकरी बंदच्या समर्थनार्थ बंद ठेवण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला. हमालही सहभागी झाले असल्याने मार्केट मध्ये शांतता दिसत आहे. तसेच बाजार पेठेत पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
- नवी मुंबईत देखील कडकडीत बंद
दरम्यान, नवी मुंबईत भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबई एपीएमसीत आज कडकडीत बंद ठेवण्यात आला. एपीएमसीमधील पाचही बाजारपेठा आज पूर्ण बंद ठेवण्यात आल्या आहेत. नव्या शेतकरी कायद्यामुळे शेतकऱ्यांसोबत माथाडी कामदारांचाही रोजगाराचा प्रश्न उपस्थित होणार असल्याने माथाडी कामगारही बंदमध्ये सहभागी आहेत.
- नाशिकमध्ये सर्व बाजार समित्या बंद
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णपणे बंद असून संपूर्ण शुकशुकाट दिसत आहे. लासलगाव, पिंपळगाव, नाशिक, मनमाड, देवाळा यासह इतर बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प आहेत. तसेच मोठया प्रमाणात पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे.