पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मन की बात’मध्ये प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कृषी क्षेत्राची भरभराट व्हायची असेल तर या क्षेत्राचे आधुनिकीकरण करावेच लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते आकाशवाणीवरून आपल्या मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. यापूर्वी बराच वेळ घालविण्यात आला आहे. आता विनाविलंब हे कार्य हाती घेतल्याशिवाय तरणोपाय नाही, असे महत्वपूर्ण विचार त्यांनी मांडले. कोरोनाचा उदेक रोखण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या लसीकरणाच्या कार्यक्रमावरही त्यांनी भाष्य केले.
मन की बात या कार्यक्रमाचा हा 75 वा भाग होता. 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाचा प्रारंभ केला होता. 75 व्या कार्यक्रमात त्यांनी मुख्यतः कृषी क्षेत्र आणि कोरोनाचा उद्रेक यांवर भर दिला. धवल क्रांती आणि मधाचे उत्पादन या क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचा त्यांनी गौरव केला.
आधुनिकीकरण अनिवार्य
कृषीक्षेत्रासमोरची आव्हाने वाढत आहेत. त्यामुळे जुन्या पद्धतींवर विसंबून राहणे महागात पडणार आहे. उत्पादनापासून विक्रीपर्यंत या क्षेत्रात आधुनिकीकरणाचे दरवाजे उघडले पाहिजेत. आपण हे यापूर्वीच करावयास हवे होते. आतापर्यंत बराच विलंब केला गेला. आता मात्र झपाटय़ाने प्रगती करणे आवश्यक असून हे काम आधुनिकीकरणाची कास धरल्यानेच साध्य होईल. त्यामुळे राजकारण दूर ठेवून आणि मतांचा विचार बाजूला ठेवून व्यापक आधुनिकीकरण स्वीकारण्याची आवश्यकता आहे, अशा अर्थाचे विचार त्यांनी व्यक्त केले.
‘दवाई भी, कडाई भी’
कोरोनाच्या नियंत्रणासाठी भारताने जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे. जगातील इतर देशांनाही आम्ही किफायतशीर दरात लस पुरविली असून आमचे जागतिक उत्तरदायित्व पार पाडण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. भारताच्या लसीकरण कार्यक्रमाची जगात प्रशंसा होत आहे. हा कार्यक्रम प्रत्येक राज्याने कसोशीने लागू केला पाहिजे. लोकांनी कोणतीही शंका न बाळगता लस घेतली पाहिजे शिवाय स्वतःची काळजीही घेतली पाहिजे. ‘दवाई’ बरोबरच ‘कडाई’ (दक्षता) हा मंत्रच आपल्याला तारेल असे प्रतिपादन त्यांनी केले.
नारीशक्तीचा नारा
विविध क्षेत्रांमध्ये महिला मोठय़ा प्रमाणात प्रगती करीत आहेत, याचाही गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी या कार्यक्रमात केला. विशेषतः क्रीडा क्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांनी देशाची मान उंचावली आहे. मिताली राज ही क्रिकेटपटू आणि पी. व्ही. सिंधू ही टेनिस खेळाडू यांचा या संदर्भात उल्लेख करणे आवश्यक आहे. महिलांना पुढे येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
लवकरच भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील. स्वातंत्र्यासाठी मागच्या पिढीने अपूर्व त्याग केला. त्यांच्या त्यागातून आपल्याला एक नागरीक म्हणून कसे वर्तन करावे याची प्रेरणा मिळते. त्यांच्या त्यागाची किंमत आपण ओळखली पाहिजे आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशा अर्थाचे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी 75 व्या मन की बात च्या माध्यमातून केले.
विविध विषयांना स्पर्श
ड 75 व्या मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींकडून विविध मुद्दय़ांना स्पर्श
ड वक्तव्याचा मुख्य भर कृषी क्षेत्राची प्रगती, महिलांचे सामर्थ्य यांच्यावर
ड कोरोना उदेकाला धैर्याने तोंड देण्यासाठी भारतीयांचे विशेष कौतुक
ड लसीकरणाच्या जगातील सर्वात मोठय़ा कार्यक्रमाची केली विशेष प्रशंसा