केपे गट काँग्रेसची पत्रकार परिषदेत टीका
वार्ताहर /केपे
कृषिमंत्र्यांनी दोन कृषी महोत्सवांना मान्यता दिली असून एक उत्तर गोव्यात व दुसरा दक्षिण गोव्यात एका एजन्सीमार्फत करण्यात येत आहे. प्रत्येक महोत्सवावर 25 कोटी रु. खर्च केले जाणार असून सुमारे 50 कोटी रु. खर्च केले जात आहेत. कोविड काळ असल्याने असे महोत्सव करणे योग्य नाही. ते रद्द करावेत व या पैशांचा शेतकऱयांच्या फायद्याकरिता उपयोग करावा, अशी मागणी केपे गट काँग्रेस समितीतर्फे केपे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली .
यावेळी व्यासपीठावर ऍड. जॉन फर्नांडिस, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रशांत वेळीप, आल्डिन्डा लाक्लेडा, लुर्दिश फर्नांडिस, ज्यो फर्नांडिस, पिएदाद डायस व इतर हजर होते. या महोत्सवांसाठी जी एजन्सी नियुक्त केलेली आहे ती सरकारच्या धोरणानुसार नसून आपल्याला हव्या त्या एजन्सीची नियुक्ती केली गेली आहे. तसेच आता आम्ही कोविड काळात असल्याने असे महोत्सव घेणे योग्य नाही. तसेच शेतकऱयांसंदर्भात फेरसर्वेक्षण करावे अशी मागणी केली होती व कायद्यांत बदल करून शेतकऱयांना फायदा कसा होईल ते पाहायला हवे होते. मात्र यावर काहीच विचार केलेला दिसत नाही. उलट असे महोत्सव आयोजित करून शेतकऱयांना काहीही फायदा होणार नाही. त्यापेक्षा या निधीचा शेतकऱयांसाठीच्या चांगल्या कामांकरिता उपयोग करावा, असे ऍड. फर्नांडिस यांनी सांगितले.
अशा महोत्सवांपेक्षा खात्याच्या अधिकाऱयांनी गावागावात जाऊन शेतकऱयांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून त्यांना योग्य मार्गदर्शन केले, तर जास्त फायदा होऊ शकतो. कृषिमंत्री एका बाजूने सेंद्रिय शेती करावी असे सांगत आहेत, तर दुसऱया बाजूने जमिनींचे प्लॉट पाडण्याचे सत्र चालू आहे. यामुळे येणारी पिढी कशी शेतीकडे वळेल, असा प्रश्न प्रशांत वेळीप यांनी केला.