राज्यभरातील शेती पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याचे आश्वासन
प्रतिनिधी / मिरज
गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पडलेल्या पावसामुळे मिरज तालुक्यातील सर्वच गावांमधी शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी राज्यमंत्री नामदार विश्वजित कदम थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. पूर्व भागातील विविध गावात जाऊन नुकसान झालेल्या सर्वच पिकांची त्यांनी पाहणी केली. राज्यातील सर्व शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.
तालुक्यातील आरग येथील दत्तात्रय गायकवाड यांच्या शेतातील कारले, भाजीपाला, ऊस या पिकांची विश्वजित कदम यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. याशिवाय ऊस, द्राक्षबागा, सोयाबीन, मका, ज्वारी यासह पालेभाज्या आणि फळ भाज्यांच्या नुकसणीचीही पाहणी करून आढावा घेतला. राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लवकरच पंचनामे करून भरपाई देण्यात येईल, यासाठी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार वचनबद्ध आहे. असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.