प्रतिनिधी/ पणजी
शेतकऱयांशी संबंधीत राज्यसभेत संमत झालेली दोन विधेयक ही सर्वसामन्य शेतकऱयांच्या हिताची आहेत. या विधेयकांमुळे शेतकरी आणि प्रत्यक्ष ग्राह यांच्यामध्ये दलाली करणाऱयांची मक्तेदारी संपूष्टात येणार आहे. असे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सांगितले. शेतकरी हा देशाचा कणा असून संमत केलेली दोन्ही विधेयक शेतकऱयांना वरदान ठरणार आहेत. शेतकऱयांच्या हितासाठी उचलेल्या ठोस पाऊलामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय शेतकीमंत्री नरेंद्रसिग तोमत यांचे तमाम गोमंतकीयांतर्फे अभिनंदन करीत असल्याचेही कवळेकर म्हणाले.
काल सोमवारी भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाबू कवळेकर बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडेही उपस्थित होते. कवळेकर पुढे म्हणाले की काँग्रेस पक्षानेही हे काम आपल्या कार्यकाळात करण्याचे ठरविले होते मात्र त्यांना ते जमले नाही. आता हे शेतकऱयांच्या हिताचे काम केवळ भाजपाने केले असल्याने काँग्रेसला पचत नाही असा ठोमण त्यांनी हाणला. सर्वसामान्य शेतकऱयांना ग्रहीत धरून जे लोक केवळ मंडीवाल्याचे किंवा दलालांचे हित जपतात तेच या विधेयकांना विरोध करतील असेही कवळेकर म्हणाले.
शेतकरी व्यापार व वाणिज्ज (संवर्धन आणि सरलीकरण विधेयक 2020) या विधेयकामुळे दलाल व मंडीवाल्यांची मक्तेदारी कमी होणार असून जे शेतकरी खऱया अर्थाने आपल्या शेतात राबतात त्यांना त्यांच्या पीकाचा योग्य मोबदला मिळणार आहे. थेट शेतकरी आणि ग्राहक यांच्यात व्यावहार होणार आहे. या विधेयकामुळे आता शेतकरी आपले पीक आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी योग्य दरात विकू शकतील. गोव्यात मंडीची पध्दत नसली तरी इतर राज्यात ही पध्दत असल्याने तेथील शेतकऱय़ांनाही या समंताचा मोठय़ाप्रमाणात फायदा मोठय़ा प्रमाणात होणार असल्याचे कवळेकर यांनी सांगितले.
सबलीकरण आणि संरक्षण 2020 या विधेयकामुळे शेतकरी आपले पीक कुणाला आणि कसे द्यायचे याबाबत पीकाच्या लागवडीच्यावेळीच कंत्राट सही करू शकतो. दरवेळा बाजारभाव बदलत असतात आणि त्याचा फटका खऱया अर्थाने शेतकऱयांना बसत असतो. पीक लागवडीच्यावेळी त्या पीकाला बाजारभाव चांगला असतो मात्र प्रत्यक्षात पीक शेतकऱयाच्या हातात येते तेव्हा त्याला अनेक कारणामुळे बाजारभाव खूपच कमी झालेला असतो. आता या विधेयकामुळे शेतकऱय़ांच्या पीकाचे संरक्षण होणार असल्याचेही कवळेकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना सदानंद तानावडे यांनीही कंद्रीय शेतकीमंत्री व पंतप्रधानाचे अभिनंदन केले आहे. भाजपाने आयोजित केलेल्या सेवा सप्ताहाचा नुकताच समारोप झाला आहे. या सप्ताहाला जनेताचा चांगला प्रतीसाद मिळाल्याचेही तानावडे यांनी सांगितले.