प्रतिनिधी / कोल्हापूर
आज संपूर्ण देशातील २६० विविध शेतकरी संघटना, डावी आघाडी, कामगार संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने शेतकरी कायदा संमत केल्याच्या विरोधात कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे समन्वयक राजू शेट्टी यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले राजू शेट्टी यांनी निवासस्थानाबाहेर कृषी विधेयकाची होळी केली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शिरोळ तहसील कार्यालयासमोर तर डावी आघाडी, शेतकरी कामगार पक्ष आदी संघटनांच्यावतीने बिंदू चौकात निदर्शने करून कृषी विधेयकाची होळी केली. यावेळी बिंदू चौकात मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत होती. आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देवकर, बाबुराव कदम, कॉ. अतुल दिघे, उदय नारकर, गिरीश फोंडे, सुभाष जाधव, नामदेवराव गावडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिरोळ येथे राहत्या घराबाहेर राजू शेट्टी यांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावेळी शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारी विधेयके आहेत. खरंतर स्वातंत्र्यापासून शेतकऱ्यांना हमीभावाचं संरक्षण होतं. ते चोरपावलांनी काढून घ्यायचं आणि मोठ्या कार्पोरेट कंपन्यांच्या हातात द्यायचे, हाच यामागचा डाव आहे. भारतात एकूण जितके अन्न धान्य उत्पादन होते, त्यातील 30 टक्के अन्न धान्य भारत सरकार नाफेड, एफसीआय आणि इतर कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी करते. खरंतर कायदा हमीभावाने खरेदी करावे, असा नाही आहे, पण नैतिकता म्हणून केंद्र सरकारच्या या कंपन्या हमीभावाच्या आसपासच्या किंमतीमध्ये माल खरेदी करतात. एअर इंडियाचे ज्या पद्धतीने खाजगीकरण झाले आणि बीएसएनएल ज्या पद्धतीने खाजगीकरणाच्या मार्गावर आहेत. त्याच मार्गाने नाफेड आणि भारतीय खाद्य निगम (एफसीआय) यांचे सुद्धा भविष्यात खासगीकरण होणार असल्याची भीती सुद्धा शेट्टी यांनी व्यक्त केली