पुलाची शिरोली/ वार्ताहर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केलेले शेती विधेयक हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या नक्कीच हिताचे आहे . विरोधकांनी राजकीय हेतू ठेवून शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. असे मत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केले.
भाजपच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पुलाची शिरोली येथील बाप्पा फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन थेट शेतकरी संवाद व शेती विषयक कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक व शेतकरी लक्ष्मण कदम हे होते. तर प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सदस्या डॉ.सोनाली पाटील यांची होती.
महाडिक म्हणाल्या पंतप्रधान मोदी सरकार माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस हा सुशासन म्हणून साजरा करतात. त्याचे औचित्य साधून पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजना व शेती विषयक मार्गदर्शन केले . तसेच देशातील अनेक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून हे विधेयक शेतकरी हिताचे कसे आहे हे पटवून देण्याचा त्यांनी आज प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या त्यांच्या संवादातून शेतकऱ्यांना कृषी विधेयक हिताचे आहे याबाबत विश्वास निर्माण होईल असे महाडिक यांनी सांगितले.