प्रतिनिधी/ सातारा
खरीप हंगाम 2021 साठी जिह्याला 1 लाख 17 हजार 730 मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले असून 44 हजार 535 क्विंटल बियाणांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. ते जिल्हा परिषदेच्या सभागृहात नुकत्याच आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत अध्यक्ष या नात्याने बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अरुण लाड, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा अधीक्षक कृषी गुरुदत्त काळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या वर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या खरीप हंगामात शेतकरी खते व बियाणांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या. तसेच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, खंडाळा, फलटण व माण तालुक्यात उन्हाळी कापूस पिक घेतले जाते. या भागातील शेतकऱयांना चांगले बियाणे उपलब्ध करुन देण्याबरोबरच खरेदी, विक्री केंद्र सुरु करण्यात यावे, अशा सुचना केल्या
त्याचबरोबर खरीप हंगामात खासगी बँकांनी शेतकऱयांच्या मागणीनुसार कर्ज पुरवठा करुन, दिलेले कर्जाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या. तसेच इतर मान्यवरांनी ही उपयुक्त अशा सूचना केल्या. या बठकीचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी केले.