अध्याय बारावा
भगवंत उद्धवाला त्यांच्या गोकुळातील कथा सांगत आहेत. त्यांच्या संगतीने सर्व चेतन, अचेतन सृष्टीचा कसा उध्दार झाला त्याबद्दल ते बोलत आहेत. ते म्हणाले, सर्व गोपी भक्तिबळानेच माझ्या पदाला पोहचल्या. माझ्या मुरलीचा ध्वनी ऐकताच गोपिका सर्व कामे सोडून देऊन आपल्या देहाचा सांभाळ करण्याचेही भान न धरता मला शोधीत माझ्याजवळ आल्या. त्याचप्रमाणे गाईही मुरलीच्या नादाने वेडावून गेल्या. माझ्या मुरलीच्या ध्वनीने मन तल्लीन झाल्यामुळे वासरे स्तनपान करण्यासही विसरली. त्यांचा तोंडातला घास तोंडात राहिला, इतके त्यांना माझे ध्यान लागले होते. मी जे यमलार्जुन वृक्ष उपटले, ते तरले ह्यात आश्चर्य काय ! पण वृंदावनातील वृक्ष, तृण, ही देखील माझ्या साहचर्याने उद्धरली हे लक्षात ठेव. मी मोराची पिसे धारण केल्यामुळे त्या मोरपिसांच्या योगाने मोरही तरले. वृंदावनात असणारे लहान वृक्ष, वेली, गवत, पाषाण, इत्यादि जड व मूढ यांचाही माझ्या सन्नीध्याने उद्धार झाला. माझ्या संगतीची अनन्य प्रीती असणे, तीच त्यांची शुद्ध भक्ती होय. त्यामुळेच खरोखर कृतकृत्य होऊन ते माझ्या स्वरूपाला पोचले. अत्यंत दुराचारी असा कालिया सर्प माझ्या पायांच्या प्रहारानेच उद्धरला. त्याचे इतर नाग व नागिणी वगैरे सर्व सर्प, परिवारासह माझ्यामुळे उद्धरले. आपल्या स्वस्वरूपाची जी प्राप्ती आहे, ती खरोखर सत्संगाशिवाय दुर्लभ आहे. हे उद्धवाला श्रीकृष्ण समजाऊन सांगत आहेत. स्वप्रयत्नांनी मला साध्य करून घेऊ असे म्हणणारे साधक योग, याग, व्रत, दान, वेदाध्ययन, वेदव्याख्यान, तप, तीर्थ, ज्ञान, ध्यान, भक्तिभावाने संन्यास घेणे इत्यादी जी अनेक साधने आहेत, ती नि÷sने त्यांच्या नियमांसह करत असतात पण मनात जर अहंकार वाटत असेल की, या साधनांनी माझी प्राप्ती होईलच होईल तर अशा दुराशेने म्हणजे चुकीच्या समजुतीने कितीही जीव तोडला तरी माझी प्राप्ती होत नाही. अशा प्रकारे साधने करून थकले असता अत्यंत प्रयासानेही माझी प्राप्ती होत नाही. पण ती माझी प्राप्ती गोपीनी सत्संगाने अनायासे करून घेतली. त्या गोपिकांच्या मनात माझ्याविषयी फार प्रीति होती आणि माझी संगती हीच त्यांची सत्संगती होती. उद्धवा ! सत्संगतीनेच खरोखर आत्मपदाची प्राप्ती होते असे समज. गोपिकांची प्रेमळ अवस्था कशी होती, त्याचा अनुभव तुला गोकुळात आलेलाच आहे. पण त्यांची प्रीती कशी होती ह्याविषयी तुला तर्कच करता येणार नाही. ते मी तुला सांगतो. गोपिकांचे निस्सीम प्रेम श्रीकृष्ण आपल्याच मुखाने सांगू लागले. उद्धवाचे भाग्य फारच मोठे ! कारण, देव आवडीचेच वर्म सांगू लागले. उद्ववा ! ज्यावेळी अक्रूर बलरामदादासह मला व्रजातून मथुरेला घेऊन निघाला, त्यावेळी माझ्याविषयीच्या गाढ प्रेमामुळे माझ्या ठिकाणीच चित्त जडलेल्या गोपी माझ्या वियोगाच्या तीव्र दुःखाने इतक्मया व्याकूळ झाल्या होत्या की, माझ्याखेरीज दुसरी कोणतीही वस्तू त्यांना आनंददायक वाटत नव्हती. अक्रूर मला बलरामासह मथुरेला नेत असता गोपिकांना जे दुःख झाले, ते मला शब्दात सांगता येत नाही. देव सांगू लागले असतानाच त्यांच्या गळय़ात गहिवर दाटून आला. भक्तांचे खरे प्रेम सांगता सांगता श्रीकृष्ण प्रेमाने पाझरू लागले कारण, भक्तकामनेचा कल्पतरू असलेल्या श्रीकृष्णाला भक्तांची करुणा निरुपम होती. मी मथुरेला जाताना पाहून त्यांच्या नेत्रातून अश्रुधारांचे पूर वाहू लागले. माझ्याकरिता त्यांचे हृदय तडतडा तुटू लागले. प्रेमाने त्या भूमीवर लोळणच घेऊ लागल्या. त्यांच्या अंतःकरणातील प्रीती अत्यंत उत्कट होती. त्यामुळे त्यांनी मागे परत जावे असा मी प्रयत्न केला असताही त्या मागे सरल्या नाहीत. पाय धरलेले सोडीचनात. माझ्यासाठी काकुळतीला येत होत्या ! त्यांच्या हृदयातील भक्ती केवळ अपूर्व होती. त्यांनी माझ्या स्वरूपाला मिठी घातली, ती सोडवू लागले असता त्यांच्या हातांची गाठ सुटेचना व त्यांनी सोडलेला श्वास त्यांच्या देहात परत जाईचना. त्या सर्वस्वी लाज विसरूनच गेल्या. सासऱयाच्या, पतीच्या व बापाच्या देखत माझ्या चरणांवर मस्तक ठेवून मोठमोठय़ाने आक्रोश करून रडू लागल्या.
क्रमशः