कृष्णाआजी आमची कोण होती-नव्हती… ठाऊक नाही. त्या वेळची एकमेव हयात व्यक्ती म्हणजे माझी आई. पण ती स्वतःच आजारी आहे. तिला सांगता येत नाही. मी तिसरी चौथीत असताना कृष्णाआजीला शेवटचे पाहिलेले. तो दिवस चांगला आठवतो.
सणासुदीला श्रीखंडाचा बेत असेल तेव्हा आम्ही कृष्णाआजीच्या दुकानात चक्का आणायला जात असू. गुढी पाडव्याला साखरेच्या गाठी आणि सटीसामाशी फुटकळ खरेदीला. किंवा कोणाबरोबर मंडईत गेलो की येताना नुसत्या जुलबी चौकशीला. कधीही गेलो तरी कृष्णाआजी दिसल्यावर मी हात पुढे करायचो आणि ती हातावर चक्क्मयाचा चिमुकला गोळा ठेवायचीच.दुकानातलेतिचे ढोबळ दर्शन असे होते. स्थूल बांधा, काठापदराच्या साडय़ा, डोक्मयावरून घेतलेला पदर, काळा वर्ण, कपाळावर हिरवे गोंदण, गळय़ात तुळशीची माळ आणि कसला तरी काळय़ा जोरात गुंफलेला ताईत, हसतमुख चेहरा. मनगटात गंडा दोऱयाची लाल-काळी गुंतवळ.
तर त्या कलत्या संध्याकाळी ती आली. आजीजवळ बसली. आजीने थोडय़ा वेळापूर्वी बटाटे भाजलेले होते. त्यातलेदान बटाटे काढून सोलले. मीठ आणि लाल तिखट लावून दोन्ही आज्यांनी खाल्ले. मग पाणी प्यायल्यावर दोघींनी तपकीर ओढली. मी कृष्णाआजीला खाऊ मागितला. आजी म्हणाली की बाहेर खेळायला जा. चेंडू घेऊन घरामागच्या बोळात मी एकटाच खेळत असताना सहज खिडकीतून बघितलं. कृष्णाआजी हमसून हमसून रडत होती. आजीने तिला मिठीत घेतलं होतं. आई तिच्या पाठीवरून फिरवीत होती. खूप उशिरा मी घरात आलो. मोठय़ा खोलीत सगळी मोठी माणसे बसलेली होती. सगळे तारस्वरात बोलत होते. कृष्णाआजी खाली मान घालून बसली होती. तिच्या समोरच्या कपबशीतला चहा निवून गेला असणार. कारण बाकीच्यांच्या समोरच्या कपबशा रिकाम्या होत्या. मी माझं दप्तर उचलून जिन्यात जाऊन बसलो. अचानक आजोबांचा कर्कश्श आवाज आला, ‘तुमच्या चुकातुम्ही निस्तरा. आता निघा. आमची जेवणं व्हायची आहेत अजून.’’
कृष्णाआजी उठून बाहेर पडली. चपलांचा फतक फतक आवाज करीत निघाली. अंगण ओलांडून फाटकाबाहेर पडली. मला तिच्या मागं जाऊन कंबरेला विळखा द्यायचा होता. तिला धीर द्यायचा होता. पण मी स्वतःच भीतीने घामाने डबडबलो होतो. पायांतलं त्राण गेलं होतं. तिने मागे वळून बघितलं. मग पाठमोरी झाली आणि निघून गेली.
तेच तिचे शेवटचे दर्शन.