वार्ताहर/ एकसंबा
कल्लोळ (ता. चिकोडी) येथे सालाबादप्रमाणे होणारी विशाळी यात्रा यंदाच्या वर्षीही मोठय़ा उत्साहात झाली. प्रदूषणमुक्त यात्रा करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. पण त्याला भाविकांचा फारसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाही. कृष्णा नदीच्या पात्रात मोठय़ा प्रमाणात टाकावू वस्तू टाकल्याने कृष्णा नदीचेच आरोग्य धोक्यात आले आहे. नदीपात्रात झालेल्या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका जलचर व मानवी आरोग्यावर होणार आहे. नदीपात्रातील पाणी पूर्णपणे दूषित होण्याअगोदर सामाजिक संस्थांनी व प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढाकार घेऊन नदीपात्राची स्वच्छता करणे आवश्यक आहे.
यात्राकाळात नदीकाठावर अनेक ठिकाणी भाविक वास्तव्यास होते. आपल्या सोबत आणलेले पूजेचे साहित्य, खाद्यपदार्थ, जेवण यासह प्लास्टिक पिशव्या, पत्रावळी, द्रोण मोठय़ा प्रमाणात नदीकाठावरच टाकण्यात आले आहे. तो टाकावू कचरा वाऱयाने नदीपात्रात पडल्याने नदीचे पाणी दूषित होऊ लागले आहे. यामुळे जलचरांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणपूरक यात्रा साजरी व्हावी तसे विचार भाविकांमध्ये बिंबविण्यासाठी स्वयंप्रेरणेने नदीपात्राची स्वच्छता केली तरच स्वच्छ भारतचा संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्यात मदत होणार आहे.
नदीत देवदेवतांचे फोटो
प्रदूषण आज सर्वच बाबतीत चिंतेचा विषय बनत चालला आहे. यात्रा, जत्रा यांचे औचित्य साधून खराब झालेले देवतांचे फोटो, पूजलेले श्रीफळ, खराब झालेल्या मूर्त्या नदीत टाकल्या गेल्या आहेत. यामुळे नदीच्या संवर्धनासाठी झटणारे हात कमी तर प्रदूषण वाढविणाऱयांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी नदी परिसरासह गावात अनेक ठिकाणी कचरा संकलित करण्यासाठी कचरा कुंडय़ांची सोय केली आहे. पण यात्राकाळात त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यात्राकाळात विविध प्रकारच्या वस्तू खासकरून प्लास्टिकचा कचरा मोठय़ा प्रमाणात टाकल्याने कृष्णा नदीची स्वच्छ व सुंदर अशी ओळख प्रदूषणामुळे बदलत चालली आहे.
महापुराची आठवण ताजी असतानाही
ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुरात कृष्णा काठचा परिसर पूर्णपणे जलयम झाला होता. उन्हाळय़ात पाण्यावाचून तर पावसाळय़ात पाण्यामुळे सर्वांचीच दैना उडाली होती. चांगली व मजेशीर यात्रा करण्याच्या नादात आपणच कृष्णामाईचा श्वास कोंडला. पर्यावरणाचा आदर केला नाही तर निसर्ग बदला घेतोच, हे यंदाच्या महापुरातून सर्वांनी अनुभवलय. असे असतानाही विविध टाकावू वस्तू कृष्णेच्या पोटात टाकण्यात आल्या. यासर्व गोष्टी प्रत्येकवर्षी होतच असतात पण यातून चांगला धडा मात्र कोणीच घेत नाही. पण जेंव्हा तिच्या सहनशक्तीचा बांध फुटतो तेंव्हा तिचे रौद्ररुप कसे असते? हे सर्वांनाच माहित आहे. यामुळे कृष्णेचे पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे.
पुढाकार गरजेचा
गांधी जयंतीनिमित्त देशभर स्वच्छता करण्यात येते. सर्वत्र याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारतला लोकप्रतिनिधींसह सामाजिक संघ-संस्थांनी मोठे पाठबळ दिले. पण आता खरी गरज आहे ती कृष्णेच्या पात्राची स्वच्छता करण्याची. खासदार, आमदार, सामाजिक कार्यकर्त्यांना ही संधी येऊन ठेपली आहे. कृष्णेचे सौंदर्य पुन्हा फुलविण्यासाठी शेकडो हातांची गरज आहे. यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे.