चौघा भावांच्या मृत्यूने कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर
वार्ताहर /अथणी
हल्याळ येथे ऊरुस असल्याने घरातील कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेले चौघे सख्खे भाऊ कृष्णा नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते. यातील एकाचा मंगळवारी मृतदेह मिळाला होता. तर अन्य तिघांचे मृतदेह बुधवारी शोधपथकाच्या हाती लागले. यावेळी त्यांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. सदाशिव बनसोडे (वय 24), दऱयाप्पा बनसोडे (वय 22), शंकर बनसोडे (वय 18) यांचे मृतदेह बुधवारी हाती लागले. तर मंगळवारी परशुराम बनसोडे याचा मृतदेह मिळाला होता.
हल्याळ येथील नदीत चौघे भाऊ कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी नदीच्या प्रवाहात चौघेही वाहून गेले होते. दरम्यान, त्यांच्या शोधासाठी एनडीआरएफ पथक, कोब्रा कोल्हापूर गृहरक्षक पथक, अग्निशमन दल प्रयत्न करत होते. मंगळवारी दुसऱया दिवशी शोधकार्य सुरू केल्यानंतर परशुराम गोपाळ बनसोडे याचा मृतदेह हाती लागला तर उर्वरित तिघांचे मृतदेह मिळाले नव्हते.
दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच शोधकार्य पुन्हा सुरू करण्यात आले. सदाशिव, शंकर व दऱयाप्पा या तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे पथकाला आढळून आले. सदर तिन्ही मृतदेह पथकाने बाहेर काढले. घटनास्थळी डीवायएसपी एस. व्ही. गिरीष, सीपीआय शंकरगौडा बसगौडर, पीएसआय कुमार हडकर, तहसीलदार दुंडाप्पा कोमर, ता. पं. अधिकारी रवी बंगारप्पन्नवर यांनी भेट देऊन पाहणी केली. उत्तरीय तपासणी करून तिन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर हल्याळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अथणी ब्लॉक काँग्रेसतर्फे मृताच्या कुटुंबीयांना सरकारी मदत द्यावी, या मागणीसाठी रास्तारोको करण्यात आला. दुंडाप्पा कोमर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सिद्धार्थ शिंगे, गौतम बनसोडे, सदाशिव भुटाळे, संजू कांबळे उपस्थित होते. आमदार महेश कुमठहळ्ळी यांनी मृताच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून सदर घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले.