दुष्काळी भागातील तलाव कोरडेच, महापुराचे पाणी जाणार होते उचलले, जलसंपदाची घोषणाही गेली वाहून
प्रतिनिधी / सांगली
जून ते जुलैच्या कालावधीमध्ये कृष्णा आणि वारणा नदीतून तब्बल 275 टीएमसी पाणी वाहून गेले आहे. महापुराच्या तीन दिवसांतच 127 टीएमसी पाणी कर्नाटकात गेले आहे. एका बाजूला महापुराने पाच जिल्ह्यात हाहाकार उडवला असतानाच दुष्काळी भाग कोरडाच राहिल्याने पुराच्या पाण्याने दुष्काळी भागातील ओढे, नाले आणि तलाव भरण्याची जलसंपदा विभागाची घोषणाही त्या पाण्याबरोबर वाहून गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
अतिवृष्टी आणि धरणांतील विसर्गामुळे कृष्णा आणि वारणेला आलेल्या महापुराचा फटका सांगली शहरासह पाच तालुक्यातील दोनशेहून अधिक गावांना बसला आहे. महापुराच्या संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या संपर्कात होते. या काळात ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनांचे आवर्तन सुरू करून दुष्काळी भागातील तलाव, ओढे, नाले भरण्याची घोषणा त्यांनी केली होती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही तशी मागणी जलसंपदा मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
पश्चिम भागात महापुराने थैमान घातले असतानाच पूर्वभागात मात्र रिमझीम पाऊस झाला. किरकोळ सरीमुळे दुष्काळी भागातील ओढे आणि तलाव कोरडेच आहेत. पाणी योजना सुरू करून दुष्काळी भागाला दिलासा देण्याबरोबर महापुराची तीव्रताही काही अंशी कमी करण्याची भूमिका होती. परंतु या काळात पाणी योजना सुरूच झाल्या नाहीत. तर उलट पाणी वाहून गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
जून,जुलैमध्ये राजापूर बंधाऱयातून 275 टीएमसी पाणी वाहून गेले आहे. 21 जुलै रोजी पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरूवात झाली. अतिवृष्टीमुळे 23 जुलैपासून कोयनेतून 50 हजार क्युसेकने विसर्ग सुरू झाला. या काळात आयर्विन पुलापासून कृष्णेतून तब्बल 74 टीएमसी पाणी अलमट्टीला वाहून गेल्याचे पाटबंधारे विभागाचे निरीक्षण आहे. तर तीन दिवसांत 38 टीएमसी पाणी वाहून गेले. तीन दिवसात वाहून गेलेले पाणी वारणा धरणाच्या साठवण क्षमतेपेक्षा जास्त आहे.
2019 च्या महापुरात 25 जुलै ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 330 टीएमसी पाणी वाहून गेले होते. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांची साठवण क्षमता 212 टीएमसी आहे. म्हैसाळ योजना सलग तीन महिने सुरू ठेवल्यास अवघे सात टीएमसी पाणी लागते. ताकारी आणि टेंभू योजनांसाठीही तुलनेने तितकेच पाणी आवश्यक असते. महापूर काळात या योजनांची आवर्तने सुरू केल्याने महापुराची तीव्रता कमी करण्यात फारसे यश आले असते किंवा नाही हे सांगता येणार नाही. परंतु या काळात दुष्काळी भागातील तलाव आणि ओढे, नाले भरले असते तर भविष्यातील या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कमी झाली असती असे तज्ञांचे मत आहे.