श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झालेला असल्याने कृष्ण जन्माष्टमी अर्थात कृष्णाचा जन्मोत्सव मध्यरात्रीच साजरा केला जातो. तथापि वृंदावन येथे एक मंदिर असे आहे की जेथे कृष्णाचा जन्मोत्सव मध्यरात्री साजरा न होता दिवसा साजरा होतो. हे मंदिर ठाकूर राधारमण मंदिर या नावाने ओळखले जाते. अशाप्रकारे दिवसा कृष्ण जन्मोत्सव साजरा करणारे हे भारतातील पहिलेच मंदिर असावे, असे मानले जाते. या मंदिरात ही परंपरा का आहे? याचे कारणही देण्यात येते.
साधारणतः 477 वर्षांपूर्वी चैतन्यमहाप्रभू यांचे अनुयायी आचार्य गोपाळभट्ट गोस्वामी यांच्याकडून अनुग्रह घेऊन ठाकूर राधारमणलालजू हे या मंदिरात वैशाख शुक्ल पौर्णिमेच्या प्रभातसमयी (सकाळी) प्रकट झाले होते, अशी मान्यता आहे. राधारमण हे श्रीकृष्णाचेच अवतार मानले जातात. त्यामुळे या मंदिरात कृष्ण जन्मोत्सव सकाळी 10 वाजता साजरा करण्याची प्रथा आहे. यंदा कृष्ण जन्माष्टमी 30 ऑगस्ट या दिवशी आहे. या मंदिरात दर जन्माष्टमीला सकाळी 10 वाजता ठाकूर राधारमणजी यांना पंचामृताने अभिषेक केला जातो. विविध वनस्पती पाने, फुले इत्यादींचा उपयोग करून महापूजा केली जाते. पवित्र नद्यांचे जल अभिषेकासाठी उपयोगात आणले जाते. हा परंपरेपासून वेगळा असणारा कृष्ण जन्मोत्सव पाहण्यासाठी असंख्य भाविक येथे उपस्थित असतात.