बलरामदादा रुक्मिणीला पुढे सांगतात-कृष्ण भेटण्यापूर्वी जीवाला व्याधी त्रास देतात. पण कृष्णाची भेट होताच आधीभौतिक, आधीदैविक, पारमार्थिक अशा तीनही प्रकारच्या व्याधीतून, दु:खातून जीवाची मुक्तता होते.
कृष्ण पावलियापाठी । मो हो ममता तुझे पोटी ।
कृष्ण नोळखीसी वो गोरटी । आत्मदृष्टी तुज नाही ।।
आत्मदृष्टीचे लक्षण । दृश्य द्रष्टा आणि दर्शन ।
तिन्ही होऊनि अकारण । परिपूर्ण श्रीकृष्ण ।।
तेथे कैचे धरिसी ध्यान । ध्याता ध्येय जाले शून्य ।
तुटला बोल खुंटले मौन । चैतन्यघन श्रीकृष्ण ।।
उरले चिन्मात्र स्फुरण । तेही मायिक तू जाण ।
हेतु मातु नाही लक्षण । ऐसा श्रीकृष्ण जाणावा ।।
हे रुक्मिणी! कृष्णाला तू अजून ओळखलेले नाहीस. कृष्ण जाणण्यासाठी जी आत्मदृष्टी हवी ती तुझ्यापाशी नाही. कारण कृष्ण प्राप्ती झाल्यावर मोह ममता हे निघून जातात. पण तुझा मोह ममता अजून तसेच आहेत. आत्मदृष्टीचे लक्षण काय? दृष्य, द्रष्टा व दर्शन ही त्रिपुटी नाहीशी होऊन ज्या दृष्टीला कृष्ण दर्शन म्हणजेच आत्मस्वरूपाचे दर्शन होते तीच आत्मदृष्टी होय. त्या स्वरूपाचे ध्यान कसे करणार? तिथे वाचा मौनावते, बोल खुंटतात. कृष्ण निव्वळ चैतन्यघन आहे. चिन्मात्राचे जे स्फुरण शिल्लक राहिले असे वाटते तेही मायेचे लक्षण समजावे. जो सर्व करणांच्या पलीकडे केवळ अस्तित्वरूप आहे तो श्रीकृष्ण तू जाण.
होती कृष्णरूपी संलग्न । ऐकोनि बळीरामवचन ।
कृष्णमय झाले मन । तेणे स्पुंदन चालिले ।।
कृष्णभाव झाला चित्ता । गेली देहबुद्धी सर्वथा ।
चरणांवरी ठेविला माथा । तिन्ही अवस्था सांडुनी ।।
वाचा झाली सद्रद । निःशेषे खुंटला अनुवाद ।
सुखे कोंदला परमानंद । पूर्ण बोध भीमकीसी ।।
नाठवती भावे दीर । वृत्ती झाली कृष्णाकार ।
ब्रह्मरूपे चराचर । देखे सुंदर निजबोधे ।।
बलरामदादाचा हा उपदेश ऐकून रुक्मिणीचे मन कृष्णमय झाले. ती भावमग्न होऊन स्फुंदू लागली. तिला देहभाव राहिला नाही. भाऊ, दीर, आप्त ही सारी नाती ती विसरली. तिला आता सर्वत्र केवळ भगवानच दिसू लागले. आता केवळ भगवंताशीच तिचे नाते उरले. तिने बलरामदादांचे पाय धरले.
देखोनि भीमकीची निजवृत्ती । हरिख न माये रेवती पती ।
उचलोनिया दोही हाती । अति प्रीती मानिली ।।
कृष्ण बळिभद्र रुक्मिणी । तिघे मीनली पूर्णपणी ।
परमानंद रणांगणी । भावे रुक्मिणी भोगीत ।।
कृष्णरुक्मिणी हलायुथ । तिघा झाली एकचि बोध ।
एका जनार्दनी आनंद । परमानंद प्रगटला ।।
बलरामदादांनी याप्रमाणे रुक्मिणीचे सांत्वन करून तिला बोध केला. तिला परमानंद प्राप्त झाला. तिची अवस्था पाहून बलरामदादांनी दोन्ही हातांनी धरून अत्यंत प्रेमाने तिला उठवले. कृष्ण, बलराम व रुक्मिणी यांचा आनंदाचे डोही त्रिवेणी संगम झाला. मग ते रणांगणही प्रयाग तीर्थ बनले.