बेळगाव / प्रतिनिधी
कॅन्टोन्मेंटचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बर्चस्वा यांनी सर्वांना सामावून घेऊन आणि व्यवस्थितशीर काम केले आहे. त्यांची काम करण्याची पद्धत खूपच शिस्तबद्ध असून, त्यांनी केलेल्या कार्याबद्दल कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडिअर रोहीत चौधरी यांनी गौरवोद्गार काढले. त्यांच्या पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.
कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बर्चस्वा यांची जोहरत येथे इस्टेट ऑफिसर म्हणून बदली झाली आहे. त्यांची आज शेवटची बैठक होती. त्यामुळे त्यांचा कॅन्टोन्मेंटच्यावतीने अध्यक्ष ब्रिगेडिअर रोहित चौधरी आणि आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी कॅन्टोन्मेंटचे कामकाज व्यवस्थितपणे हाताळले आहे. बैठका असो किंवा कोविड कालावधीत कामकाज करताना सर्वांची काळजी घेतली होती, असे यावेळी ब्रिगेडिअर रोहीत चौधरी यांनी सांगितले.
श्री बर्चस्वा हे दोन वर्षापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रूजू झाले होते. त्याच वेळी शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर कोरोना विषाणुचा प्रसार झाला. कॅन्टोन्मेंट हद्दीत कोरोनाचे रुग्ण आढळल्याने संपूर्ण कॅन्टोन्मेंट परिसर सील करण्यात आला होता. अशा परिस्थितीत महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने कॅन्टोन्मेंट परिसर सॅनिटायझ्ड करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला नाही. तटपुंज्या उत्पन्नात कॅन्टोन्मेंटचा कारभार चालविण्याची वेळ श्री बर्चस्वा यांच्यावर आली. अशा स्थितीतही सामाजिक संघटनांच्या सहकार्याने कोरोना कालावधीत जीवनावश्यक साहित्य गरजुंना उपलब्ध करून दिले. कॅन्टोन्मेंट रूग्णालयात कोरोनाबाधितांसाठी विशेष सुविधा उपलब्ध केल्या होत्या. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी प्रयत्न केले होते. कॅन्टोन्मेंट रूग्णालयात नगर आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा आरोग्य खात्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच कॅन्टोन्मेंटच्यावतीने कन्नड, मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळा चालविल्या जातात. पण निधीअभावी शाळा चालविणे कठीण बनले आहे. शाळेकरीता निधी उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे त्यांच्या कार्याचा विचार करून त्यांचा सन्मान कॅन्टोन्मेंटच्यावतीने करण्यात आला.
कॅन्टोन्मेंटचे कामकाज करताना लोकप्रतिनिधी, अध्यक्ष आणि कर्मचारी वर्गाने खूप सहकार्य केले. त्यामुळेच आपली जबाबदारी व्यवस्थित सांभाळता आली, असे सांगून श्री बर्चस्वा यांनी कृतज्ञता व्यक्त केली.