स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी : कचऱयाचे ढिगारे साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंटकडून स्वच्छ भारत अभियान राबवून परिसर स्वच्छ ठेवण्याचा आटापिटा केला जात आहे. मात्र युनियन जिमखाना ते अरगन तलावापर्यंतच्या रस्त्याशेजारी कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेल्या दुसऱयाच दिवशी कचरा टाकण्यात येत असल्याने कॅन्टोन्मेंटच्या स्वच्छता मोहिमेवर पाणी पडत आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डकडून अलिकडेच स्वच्छता पंधरावडा मोहीम हाती घेवून विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. विशेषतः राजेंद्र प्रसाद चौकातील वनिता विद्यालयाशेजारी साचलेला कचरा हटवून स्वच्छता करण्यात आली. तसेच रस्त्याशेजारी वाढलेली झाडेझुडपे हटवून स्वच्छता मोहीम राबविली. पण स्वच्छता मोहीम राबविलेल्या चोवीस तासाच्या आतच याठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचले असून दुर्गंधी पसरली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. पण कचऱयाची उचल नियमितपणे केली जात नाही. कचऱयाची उचल केली की, थेट पंधरा दिवसांनंतर पुन्हा कचरा उचल केला जातो. त्यामुळे याठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचत असल्याने बाजारपेठेत ये-जा करणाऱया नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
युनियन जिमखाना ते अरगन तलाव गांधी चौकापर्यंतचा रस्ता कचरा डेपो व डंपिंग यार्ड बनला असल्याच्या तक्रारी अनेकवेळा करण्यात येतात. पण आवश्यक उपाय योजना राबविण्याच्या दृष्टीने कॅन्टोन्मेंटकडून किंवा लष्कराकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. यामुळे शहराचे प्रवेशद्वार असलेला हा रस्ता कचऱयाच्या विळख्यात सापडला आहे. रस्त्याच्या दुतर्फा जुन्या घराचे साहित्य तसेच सर्वच प्रकारचा कचरा टाकला जात आहे. ‘कचरा टाकू नये’ असा लावलेला फलकच कचऱयाच्या विळख्यात सापडला आहे. यामुळे हा रस्ता कधी स्वच्छ होणार, असा मुद्दा उपस्थित होत आहे. कचरा टाकण्यात येत असल्याने अलिकडे मटण, चिकन दुकानातील कचरादेखील टाकण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे ये-जा करणाऱया वाहनधारकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. येथील समस्येकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड व लष्कराचे अधिकारी लक्ष देतील का? अशी विचारणा होत आहे.