प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध कार्यालयांमध्ये नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. सध्या सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असून, अनलॉक प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्डचे कार्यालय अद्यापही नागरिकांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालयात नागरिकांना प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. तसेच कोरोनाची लागण सरकारी कार्यालयांतील अधिकाऱयांना, कर्मचाऱयांना होऊ नये याकरिता सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रवेश बंदी करण्यात आली होती. याची अंमलबजावणी सर्वच कार्यालयांमध्ये करण्यात आली होती. कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात देखील नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. तसेच आवश्यक काम असल्यास थर्मल चाचणी करून प्रवेश देण्यात येत होता. पण लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर शहरातील सर्व कार्यालयांमधील कामकाज सुरू झाले आहे. कोरोनाची लागण कर्मचाऱयांना झाल्यास सदर कार्यालय दोन दिवसांसाठी बंद ठेवून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली असल्याने विविध कार्यालयांमध्ये कामकाज सुरू करण्यात आले आहे. अनलॉक प्रक्रिया राबवून विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात नागरिकांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. कोणत्याही कामानिमित्त गेलेल्या नागरिकांची विचारपूस करून महत्त्वाचे काम असल्यासच प्रवेश देण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. तसेच कोणत्या विभागात, कोणत्या अधिकाऱयाला भेटायचे आहे याची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱयांच्या परवानगीनंतरच नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांची कामे रखडली आहे. सर्वत्र व्यवहार सुरू झाले असताना कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांना कोरोनाची धास्ती लागून आहे. पण याचा फटका नागरिकांना बसत आहे.