आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा : बिल अदा न केल्याने पाणीटंचाईची समस्या
प्रतिनिधी /बेळगाव
शहरासह कॅन्टोन्मेट बोर्डमधील रहिवाशांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने बिल अदा केले नसल्याने एलऍण्डटी कंपनीने कॅन्टोन्मेंटच्या पाणी वितरणात कपात केली आहे. परिणामी आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पाणीसमस्येचा तिढा कधी सुटणार? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
कॅन्टोन्मेंट बोर्डने पाणीपुरवठय़ाचे बिल अदा केले नसल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यापूर्वी विद्युत बिलाची रक्कम अदा न केल्याने पथदिपाचा विद्युत पुरवठा हेस्कॉमने बंद केला होता. पण एसएफसी अनुदानामधून विद्युत बिलाची रक्कम अदा करण्याची विनंती कॅन्टोन्मेंट बोर्डने केली असल्याने विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे. पण पाण्याचे बिल अदा केले नसल्याच्या कारणास्तव गेल्या महिन्याभरापासून पाणी वितरणात कपात करण्यात आली असल्याने कॅन्टोन्मेंटवासियांना आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पाणी बिलाची रक्कम थकल्याने पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंटने अनेकवेळा केला. पण पाणीपट्टी वाढ करण्यास सातत्याने विरोध करण्यात आला. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या पाणी बिलाची रक्कम आता अडीच कोटीच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे एलऍण्डटी कंपनीने कॅन्टोन्मेंटच्या पाणी वितरणात कपात केली आहे. दररोज केवळ तीन तास पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने मिळणारे पाणी संपूर्ण कॅन्टोन्मेंट परिसरात पुरवठा करणे अशक्मय झाले आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ
नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याने काही नागरिकांना पाणी मिळत नाही. तर काही नागरिकांनी नळांना थेट विद्युत मीटर लावल्याने अन्य नागरिकांना पाणी मिळणे मुश्कील बनले आहे. सध्या मुबलक पाणीसाठा असूनही कॅन्टोन्मेंटवासियांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पाणीपुरवठय़ाची समस्या कधी निकालात काढणार, असा मुद्दा उपस्थित होत असून सुरळीत पाणीपुरवठय़ाची मागणी होत आहे.