अमरिंदर सिंह यांच्याकडून पत्रकार परिषदेचे आयोजन
वृत्तसंस्था / जालंधर
कॅप्टन अमरिंदर सिंह बुधवारी पंजाबमध्ये राजकारणातील नवी खेळी सुरू करणार आहेत. याकरता अमरिंदर सिंह मागील एक महिन्यापासून तयारी करत होते. कॅप्टननी आज चंदीगडमध्ये पत्रकार परिषद बोलाविली असून यात नव्या पक्षाची घोषणा होऊ शकते. यामुळे पंजाब काँग्रेसमधील हालचालींना वेग आला आहे.
अमरिंदर सिंह यांच्या पत्रकार परिषदेसंबंधी कळताच काँग्रेसने स्वतःच्या आमदारांशी संपर्क साधला आहे. याचबरोबर मोठय़ा नेत्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे. अमरिंदर सिंह यांच्यासाब्sात काँग्रेसचे दिग्गज नेते देखील पत्रकार परिषदेत दिसून येऊ शकतात अशी चर्चा आहे.
विशेषकरून चरणजीत चन्नी हे मुख्यमंत्री झाल्यावर मंत्रिपदावरून हटविण्यात आलेल्या आमदारांवर सर्वांची नजर आहे. यात राणा गुरमीत सोढी, साधू सिंह धर्मसोत, गुरप्रीत कांगड, बलबीर सिद्धू आणि शाम सुंदर अरोडा यांचा समावेश आहे. काँग्रेसचे सुमारे 15 आमदार अमरिंदर यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
निकटवर्तीयांनी सोडली साथ
अमरिंदर नवी सुरुवात करत असले तरीही त्यांचे निकटवर्तीय साथ सोडत आहेत. यात सर्वात मोठे नाव कॅप्टन संदीप संधूंचे आहे. अमरिंदर हे मुख्यमंत्री असताना संधू हे त्यांचे सल्लागार राहिले होते. अमरिंदर यांचे सर्वात जवळचे व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जात होते. अमरिंदर यांना हटविण्यात आल्यावर त्यांनी सल्लागारपद सोडले होते. परंतु उपमुख्यमंत्री रंधावा यांच्यासोबत ते अचानक दिसून आले. तर ढिल्लो देखील नव्या सरकारच्या बाजूने असल्याचे चित्र आहे.
अनेक मुद्दय़ांवर बोलणार
कॅप्टन अमरिंदर यांच्याशी निगडित सर्वात मोठा मुद्दा त्यांच्या पाकिस्तानी मैत्रिण अरुसा आलम यांचा आहे. अरुसा प्रकरणी काँग्रेसनेच राजकारण सुरू केले आहे. पण कॅप्टननी अरुसासोबतचे सोनिया गांधी समवेत दिग्गज व्यक्तिमत्त्वांची छायाचित्रे प्रसिद्ध करून सर्वांची तोंडे बंद केली आहेत. तर कृषी कायद्यांबद्दल निर्णय घेतल्यावरच भाजपशी आघाडी होऊ शकते, असे अमरिंदर यांनी स्पष्ट केले आहे. पंजाबमध्ये सर्वपक्षीय बैठकीद्वारे चन्नी सरकारने बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढविण्याच्या विरोधात प्रस्ताव संमत केला आहे. यावर कॅप्टन भूमिका मांडू शकतात.
काँग्रेसला पूर्वीच रामराम
कॅप्टन अमरिंदर यांनी पूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकला आहे. नवज्योत सिंह सिद्धू यांना काँग्रेसने हाकलले तरीही आपण काँग्रेसमध्ये परतणार नाही. तसेच भाजपमध्येही सामील होणार नाही. मी स्वतःची वेगळी फौज तयार करणार आहे, म्हणजेच नवा पक्ष स्थापन करून निवडणूक लढणार असल्याचे अमरिंदर यांनी म्हटले आहे.