शहा-नड्डा यांना भेटले कॅप्टन अमरिंदर सिंह- जागावाटपावर चर्चा सुरू
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, कॅप्टन अमरिंदर सिंह आणि सुखदेव सिंह ढींडसा यांच्या पक्षादरम्यान आघाडीची औपचारिक घोषणा झाली आहे. पंजाब भाजपचे प्रभारी अन् केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या आघाडीची घोषणा केली आहे. या पक्षांमध्ये आता जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. तत्पूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंह आणि ढींडसा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची भेट घेतली.
जानेवारी महिन्यात पंजाब निवडणुकीची घोषणा होऊ शकते. अशा स्थितीत आता संयुक्तपणे निवडणूक लढण्यासाठी भाजप, कॅप्टन आणि ढींडसा यांनी जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत.
कॅप्टन, भाजप आणि शिअद (संयुक्त) यावेळी पारंपरिक आघाडी नव्हे तर जागावाटपाच्या सूत्राद्वारे निवडणूक लढविणार आहे. यात प्रत्येक मतदारसंघात कुणाचा उमेदवार विजयाच्या स्थितीत आहे हे पाहून त्यालाच उमेदवारी देण्यात येणार आहे. संबंधित उमेदवाराला अन्य पक्ष पूर्ण पाठिंबा देतील. यात जागांचा आकडा नव्हे तर जिंकण्याच्या क्षमतेला प्राधान्य देण्यात येत आहे.
जागावाटपावरून तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींची एक टीम तयार करण्यात आली आहे. ही टीमच जागावाटप निश्चित करणार आहे. तसेच तिन्ही पक्षांचे एक संयुक्त घोषणापत्र तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
पंजाबमध्ये भाजप शहरी भागात अधिक जोर लावणार आहे. पंजाबच्या एकूण 117 जागांपैकी 40 शहरी मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांमध्ये भाजप स्वतःचा उमेदवार उभा करू शकतो. याचबरोबर 51 निमशहरी मतदारसंघांमध्ये जेथे शहरी मतदार अधिक आहे, तेथेही भाजपचा उमेदवार उभा असणार आहे.
ग्रामीण क्षेत्रांमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष आणि सुखदेव ढींडसा यांच्या शिअद (संयुक्त) चे उमेदवार उभे केले जाणार आहेत. यामागील मोठे कारण ग्रामीण मतपेढीत या दोन्ही नेत्यांचा असलेला प्रभाव आणि शेतकरी आंदोलनामुळे भाजपला होत असलेल्या विरोधापासून वाचणे आहे.
नोव्हेंबर महिन्यात कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेसला रामराम ठोकून स्वतःचा नवा पक्ष ‘पंजाब लोक काँग्रेस’ स्थापन केला होता. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. तर कृषी कायद्यांच्या मुद्दय़ावरून भाजपचा पारंपरिक सहकारी राहिलेला शिरोमणी अकाली दलाने रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे भाजपला पंजाबमध्ये आता नवे सहकारी शोधावे लागत आहेत.